मागण्या मान्य करुन घेण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी संघटित रहावे ः मच्छिंद्र कदम

  • By admin
  • April 10, 2025
  • 0
  • 143 Views
Spread the love

नाशिक ः क्रीडा शिक्षकांनी संघटित होऊन शासनाकडून विविध मागण्या मान्य करून घ्याव्यात. तसेच खेळाडूंची रजिस्ट्रेशन फीबाबत राज्य मंडळाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन सहसचिव डॉ मच्छिंद्र कदम यांनी केले.

नाशिक जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने क्रीडा शिक्षक यांच्यासाठी उद्बोधन शिबिराचे आयोजन जी एस रुंगठा हायस्कूल अशोकस्तंभ येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ मच्छिंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ कदम बोलत होते.

या शिबिरास नाशिक जिल्ह्यातून २७३ क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन नाशिक जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना यांनी केले होते. विविध क्रीडा विभागाच्या योजना बाबतचे मार्गदर्शन नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाबली हनुमानाच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी शिर्डी येथे १२ ते १४ एप्रिल रोजी क्रीडा शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होत असून त्याचे आयोजक नाशिक जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना आहे. सदर अधिवेशनात जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पाटील यांनी केले.

क्रीडा शिक्षकांची भूमिका, राज्याचे सदोष क्रीडा धोरण व क्रीडा शिक्षकांची पद निर्मिती यासाठी संघर्ष उभा करण्याबाबत क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांनी सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना आवाहन केले. या शिबिरामध्ये प्रथम सत्रात क्रीडा शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती डॉ योगेंद्र पाटील यांनी दिली. तसेच विविध शासनाच्या योजनांची माहिती तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील व भाऊसाहेब जाधव यांनी दिली.

या कार्यक्रम प्रसंगी विविध तालुक्याचे क्रीडा प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नाशिक विभाग आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संजय चव्हाण, क्रीडा शिक्षक पुरस्कार किशोर राजगुरू, आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार संदीप भगरे, नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम कमिटीकरिता निवड झालेले अमोल जोशी व वैभव खवळे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले. किशोर राजगुरू यांनी आभार मानले. या प्रसंगी राजेंद्र सोमवंशी, चंद्रकांत पठाडे, प्रवीण पाळदे, तेलोरे, अनिल ढोकणे, हेमंत पाटील, मधुकर वाघ, कैलास आरोटे, विजय सोनवणे, राठोड, पुनीत आवटे, राजेंद्र बच्छाव, येवला तालुका प्रमुख उंडे, खंडू भोये, मालेगाव तालुका प्रमुख जावेद अन्सारी. चिन्मय देशपांडे, संजय मगर, पवन खोडे, सतीश कांबळे, संतोष लहामगे, भरत खत्री, प्रणव अहिरे, कीर्ती गायकवाड, अनेक क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *