
नांदेड ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष विक्रात खेडकर यांचा इशारा
नांदेड ः महाराष्ट्र शासनातर्फे नांदेड जिल्हा अस्तित्वात आल्यापासून खेळासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. त्यामुळे विविध स्तराच्या स्पर्धा घेण्यासाठी दुसऱ्यांच्या मैदानाची मागणी करावी लागते. त्यामुळे तत्कालीन बांधकाम मंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी असरजन कौठा येथे मंजूर करून घेतलेली २५ एकर जागेचा प्रस्ताव ३ वर्षांपासून मंत्रालयात धुळ खात मंजुरी अभावी पडला आहे. ती जागा मंजूर करून त्वरीत जिल्हा क्रीडा संकुल समितीला द्यावी अन्यथा २५ एप्रिलपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नांदेड ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष विक्रांत खेडकर, महासचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी पालकमंत्री अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
सोमवारी (२१ एप्रिल) शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेवून नांदेड ऑलिम्पिक संघटनेच्या व विविध क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे क्रीडा संकुल समितीच्या जागेविषयी आपले म्हणणे मांडले. या शिष्टमंडळात विक्रांत खेडकर (बॉक्सींग, रायफल शुटींग), बालाजी पाटील जोगदंड (तायक्वांदो, आर्चरी), डॉ रमेश नांदेडकर (खो-खो), ज्ञानेश्वर सोनसळे (सायकलिंग), गोविंद पांचाळ (ॲथलेटिक्स), विनोद गोस्वामी (बास्केटबॉल), संजय चव्हाण, राष्ट्रपाल नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांदेडला उच्च दर्जाचे मैदान प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नसल्याने खेळाडू बाहेरच्या जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यात प्रशिक्षण घेऊन नांदेड जिल्ह्यातून शिवछत्रपती पुरस्कार घेत आहेत ही नांदेडच्या क्रीडा क्षेत्रासाठी विचार करण्याची बाब असून कौठा येथे मंजूर झालेली २५ एकर जमीन क्रीडा संकुलाला मिळाल्यास त्यात चांगले खेळाडू तयार होतील. त्यामुळे सदर क्रीडा संकुलाला ती जमीन हस्तांतरित केल्यास ऐतिहासिक नांदेड नगरीतील खेळाडूंना स्वतःचे व्यासपीठ मिळेल. त्यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा २५ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नांदेड ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष विक्रांत खेडकर, महासचिव बालाजी पाटील जोगदंड, डॉ राहुल वाघमारे, जनार्दन गोपिले, जयपाल रेड्डी, रमण बैनवाड, प्रलोभ कुलकर्णी, वृषाली पाटील जोगदंड, राजेश जांभळे, जसविंदरसिंग रामगडीया, अजगर अली पटेल, मनोज जोशी, डॉ दिलीप भडके, नवनाथ पोटफोडे, इम्रान खान, मधुकर क्षीरसागर, विष्णू पुरणे यांनी दिला आहे.