मुंबई इंडियन्स संघाचा सलग सहावा विजय, गुणतालिकेत अव्वल  

  • By admin
  • May 2, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

राजस्थान रॉयल्स प्लेऑफ शर्यतीतून बाहेर, कर्ण शर्मा, बोल्टची प्रभावी गोलंदाजी 

जयपूर ः मुंबई इंडियन्स संघाने सलग सहाव्या विजयासह आयपीएल स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम ठेवली. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघ या पराभवासह प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबई संघाने राजस्थान संघाचा तब्बल १०० धावांनी पराभव केला. 

कर्ण शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा डाव ११७ धावांवर गुंडाळला. यांसह रियान परागचा संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ बनला. त्यांच्या आधी चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. 

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने २० षटकांत दोन गडी गमावून २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानला १६.१ षटकांत १० गडी गमावून फक्त ११७ धावा करता आल्या आणि त्यांनी सामना १०० धावांनी गमावला, जो त्यांचा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी, आरसीबीने २०२३ मध्ये राजस्थानला ११२ धावांनी पराभूत केले होते. त्याच वेळी, मुंबईचा कोणत्याही संघाविरुद्धचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.

सलग सहाव्या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ११ पैकी सात सामने जिंकल्यानंतर त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट १.२७४ झाला आहे. त्याच वेळी, राजस्थान सहा गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -०.७८० झाला. आरसीबी १० पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवून आणि ०.५२१ च्या निव्वळ धावगतीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात १४ गुण आहेत. पंजाब १३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि गुजरात १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. २०१२ नंतर जयपूरमध्ये राजस्थानविरुद्ध मुंबईचा हा पहिलाच विजय आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांच्याकडून, जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३० धावांची खेळी खेळली. त्याने २७ चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि तितकेच षटकार मारले. मुंबई संघाविरुद्ध यशस्वी जैस्वालने १३, नितीश राणाने ९, ध्रुव जुरेलने ११, शुभम दुबेने १५, महिश टीक्षानाने २, कुमार कार्तिकेयने २ आणि आकाश मधवालने नाबाद ४ धावा केल्या. त्याच वेळी, वैभव सूर्यवंशी आणि शिमरॉन हेटमायर यांना खातेही उघडता आले नाही. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय दीपक चहर आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. महेश थेक्षानाने रायनला बोल्ड केले. तो ३८ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. यानंतर रोहित शर्माने ३६ चेंडूत ५३ धावा केल्या. दोघांनी हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने ४८-४८ धावांची तुफानी खेळी केली आणि संघाचा धावसंख्या २०० च्या पुढे नेला. राजस्थानकडून महेश थीकशन आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *