
कोलंबो ः तिरंगी मालिकेत श्रीलंका महिला संघाने भारतीय महिला संघावर तीन विकेट राखून विजय मिळवला. एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाचा हा भारतीय संघावर आतापर्यंत मिळवलेला केवळ तिसरा विजय आहे.
भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात नऊ बाद २७५ धावा काढल्या. त्यात रिचा घोष हिने सर्वाधिक ५८ धावा फटकावल्या. तिने पाच चौकार व तीन षटकार मारले. प्रतिका रावल (३५), जेमिमा रॉड्रिग्ज (३७), हरमनप्रीत कौर (३०), हरलीन देओल (२९), दीप्ती शर्मा (२४), स्मृती मानधना (१८), काशवी गौतम (१७), अरुंधरी रेड्डी (नाबाद ९), स्नेह राणा (१०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघ २७५ धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. श्रीलंका संघाकडून सुगंधिका कुमारी (३-४४) व चामरी अथापथ्थु (३-४३) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
श्रीलंका महिला संघाने ४९.१ षटकात सात बाद २७८ धावा फटकावत तीन विकेटने सामना जिंकला. हर्षिता समरविक्रम (५३) व नीलाक्षी डी सिल्वा (५६) यांच्या आक्रमक अर्धशतकांनी श्रीलंकेचा विजय झाला. कविशा दिलहारी (३५), विश्मी गुणरत्ने (३३), अनुष्का संजीवनी (नाबाद २३), सुगंधिका कुमारी (नाबाद १९) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाकडून स्नेह राणा हिने ४५ धावांत तीन गडी बाद केले.