शानदार विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफ फेरीत 

  • By admin
  • May 21, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

दिल्ली कॅपिटल्स ५९ धावांनी पराभूत; सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनरची दमदार कामगिरी 

मुंबई : सूर्यकुमार यादव (नाबाद ७३), मिचेल सँटनर (३-११), जसप्रीत बुमराह (३-१२) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५९ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स संघाने १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गुजरात, आरसीबी, पंजाब किंग्ज हे तीन संघ यापूर्वीच प्लेऑफ फेरीत दाखल झाले आहेत. मुंबईचा शेवटचा सामना पंजाब किंग्ज संघाशी २६ मे रोजी होणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी १८१ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीची केएल राहुल व फाफ डू प्लेसिस ही सलामी जोडी मैदानात उतरली. मात्र, राहुल (११), फाफ डू प्लेसिस (६) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. त्यापाठोपाठ अभिषेक पोरेल (६) देखील स्वस्तात बाद झाला. त्यावेळी दिल्लीची धावसंख्या तीन बाद २७ अशी बिकट झालेली होती. 

प्रारंभीच्या या धक्क्यातून दिल्ली संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. विप्रज निगम याने ११ चेंडूत २० धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. समीर रिझवी याने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. त्याने ६ चौकार व १ षटकार मारला. समीरने थोडी कडवी झुंज दिली. स्ट्रिस्टन स्टब्स (२) देखील लवकर बाद झाला. बुमराह याने स्टब्सला पायचीत बाद करुन मोठा धक्का दिला. आशुतोष शर्मा याला १८ धावांवर बाद करुन सँटनर याने दिल्लीचा पराभव निश्चित केला. सँटनर याने अवघ्या ११ धावांत तीन विकेट घेईन दिल्ली संघाची दाणादाण उडवून दिली. माधव तिवारी (३), चामीरा (नाबाद ८), कुलदीप यादव (७), रहमान (०) या तळाच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करुन मुंबईने १८.२ षटकात दिल्लीला १२१ धावांवर रोखून ५९ धावांनी सामना जिंकला. 

जसप्रीत बुमराह (३-१२), मिचेल सँटनर (३-११) यांनी अचूक व प्रभावी मारा करत प्रत्येकी तीन विकेट घेऊन संघाचा विजय सुकर बनवला. ट्रेंट बोल्ट (१-२९), दीपक चहर (१-२२), विल जॅक्स (१-१६), कर्ण शर्मा (१-३१) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

सूर्यकुमार यादवची वादळी फलंदाजी 
सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १८० धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी शेवटच्या १२ चेंडूत ४८ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन तर दुष्मंथ चामीरा, मुस्तफिजूर रहमान आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात मुंबईची सुरुवात खराब झाली. माजी कर्णधार रोहित शर्मा फक्त पाच धावा करून बाद झाला. यानंतर, विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन यांनी जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु जॅक्स १३ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला तर रिकेल्टनला फक्त २५ धावा करता आल्या. तिलक वर्माने २७ आणि हार्दिक पंड्याने तीन धावा केल्या. त्याच वेळी, सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत सात चौकार आणि सहा गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ७३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय, नमन धीरने आठ चेंडूत दोन चौकार आणि तितक्याच षटकारांसह २४ धावा केल्या आणि नाबाद राहिला.

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीने अर्धशतकी भागीदारी करुन डावाला आकार दिला. तिलक वर्मा २७ धावांवर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याने तुफानी फलंदाजी केली. सूर्यकुमार याने शेवटच्या दोन षटकात सामन्याचे चित्र बदलून टाकले. मु्केश कुमार व चमीरा यांच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार अक्षरश: तुटून पडला. सूर्यकुमार याने ४३ चेंडूत नाबाद ७३ धावा फटकावल्या. त्याने ही धमाकेदार खेळी साकारताना चार टोलेजंग षटकार व सात चौकार मारले. नमन धीर याने केवळ ८ चेंडूंचा सामना करत नाबाद २४ धावा फटकावत आपले महत्त्वाचे योगदान दिले. नमन याने दोन चौकार व दोन षटकार मारले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *