
निखिल वर्माचे शतक
मुंबई ः राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा फटका ३३व्या एलआयसी एमसीए कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेला बसला. तिसऱ्या फेरीतील आठपैकी सहा सामन्यांचा दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. मात्र विरारच्या अवर्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात आझाद मैदान केंद्राने निखिल वर्मा याने काढलेल्या दमदार शतकामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पालघर-बोईसर केंद्रावर विजय मिळवला.
दुसऱ्या दिवशी विरार आणि डहाणूच्या अदानी क्रिकेट मैदानावरील सामने पार पडले. पालघर-बोईसर केंद्राला पहिल्या डावात १७२ धावांवर रोखल्यानंतर आझाद मैदान केंद्राने निखिल वर्माच्या नाबाद १३७ धावांच्या खेळीमुळे २११ धावा उभारल्या. निखिलने १३७ चेंडूंत २६ चौकारांची आतषबाजी करत शतकी खेळी साकारली. मात्र अन्य फलंदाजांनी फारशी साथ न दिल्यामुळे आझाद मैदान केंद्राला मोठी धावसंख्या रचता आली नाही. पालघर-बोईसर केंद्राच्या आयुष पाटीलने चार बळी मिळवत आझाद मैदान केंद्राच्या फलंदाजांना वेसण घातली. त्यानंतर पालघर-बोईसर केंद्राला दुसऱ्या डावात ३३ षटकांत ८ बाद १०८ धावा करता आल्या. पण पहिल्या डावातील ३९ धावांच्या आघाडीमुळे आझाद मैदान केंद्राला विजयी घोषित करण्यात आले.
डहाणू येथे विरार केंद्र आणि मालाड केंद्र यांच्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगला. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी विरार केंद्राने ३८ षटकांत २ बाद ९८ धावा केल्या. मात्र हा सामना अनिर्णीत राखण्यात आला.