
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱयावर जाणार आहे. भारतीय संघ १९३२ पासून इंग्लंड दौरा करत आहे. १९३२ ते २०२५ या ९३ वर्षांच्या कालावधीत भारतीय संघ केवळ तीन कसोटी मालिका जिंकू शकलेला आहे. यावरुन इंग्लंड दौरा हा भारतीय संघासाठी किती कठीण परीक्षा घेणारा असतो हे लक्षात येईल. इंग्लंड दौरा करणारा भारतीय संघ युवा शुभमन गिल याच्या नेतृत्वात खेळणार आहे. साहजिकच शुभमन गिलची कठीण परीक्षा या मालिकेत होणार आहे.
या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे आणि ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची जबाबदारी गिलच्या खांद्यावर असेल.

इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटी मालिका जिंकू शकले फक्त ३ भारतीय कर्णधार
भारताने १९३२ मध्ये इंग्लंडच्या भूमीवर पहिला कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये भारतीय संघाचा १५८ धावांनी पराभव झाला, त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार सीके नायडू होते. १९३२ पासून, भारतीय संघाला इंग्लंडच्या भूमीवर फक्त तीन वेळा कसोटी मालिका जिंकता आली आहे. भारताने १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली, १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २००७ मध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची नावे समाविष्ट नाहीत.

१. अजित वाडेकर
१९७१ मध्ये, अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. भारतीय संघाने ही मालिका १-० अशी जिंकली. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. यानंतर, भागवत चंद्रशेखरने तिसऱ्या कसोटीत शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्यात एकूण ८ विकेट्स घेतल्या आणि संघाला सामना जिंकण्यास मदत केली.
२. कपिल देव
१९८६ मध्ये, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांनी शानदार कामगिरी केली. यामुळे इंग्लंडला पहिल्या सामन्यात ५ विकेट्सने आणि दुसऱ्या सामन्यात २७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि टीम इंडियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
३. राहुल द्रविड
२००७ मध्ये, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. त्यानंतर पहिला आणि तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात झहीर खान संघाचा सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. त्याने सामन्यात एकूण ९ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे, टीम इंडियाने कसोटी मालिका १-० ने जिंकली.