
लंडन ः एकेकाळचे दिग्गज फलंदाज जेफ्री बॉयकॉट हे झिम्बाब्वेविरुद्ध शतके झळकावून देखील इंग्लंडच्या जॅक क्रॉली आणि ऑली पोप यांनी त्यांच्या ‘तांत्रिक आणि मानसिक समस्या’वर मात केली आहे यावर सहमत नाहीत आणि पुढील महिन्यात होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांचे खरे आव्हान असेल असा त्यांचा विश्वास आहे.

गेले काही महिने क्रॉलीसाठी खूप कठीण होते. न्यूझीलंडमध्ये त्याला संघर्ष करावा लागला, जिथे त्याची सरासरी नऊपेक्षा कमी होती आणि सर्व सहा डावांमध्ये मॅट हेन्री याने त्याला बाद केले. २०२४ हे वर्ष पोपसाठी चढ-उतारांनी भरलेले होते. हैदराबादमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १९६ धावांची शानदार खेळी खेळल्यानंतर, त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही.
बॉयकॉट यांनी डेली टेलिग्राफमधील त्यांच्या स्तंभात लिहिले आहे की, ‘क्रॉली आणि पोप यांनी त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम करणाऱ्या तांत्रिक आणि मानसिक समस्या सोडवल्या आहेत असा निष्कर्ष आपण अद्याप काढू शकत नाही, कारण झिम्बाब्वेची गोलंदाजी खूपच सामान्य होती.’ इंग्लंडचे तीन आघाडीचे फलंदाज क्रॉली, बेन डकेट आणि पोप यांनी शतके ठोकली, ज्यामुळे यजमान संघाने झिम्बाब्वेविरुद्धचा डाव सहा बाद ५६५ धावांवर घोषित केला. इंग्लंडने हा एकमेव कसोटी सामना एक डाव आणि ४५ धावांनी जिंकला.
भारत-इंग्लंड मालिका
बॉयकॉट म्हणाले, ‘ते मध्यमगती गोलंदाज होते, जे क्रॉली आणि पोपच्या फलंदाजीतील कोणत्याही त्रुटी उघड करण्यासाठी पुरेसे चांगले नव्हते. चांगल्या गोलंदाजांविरुद्ध खरोखर काही सुधारणा झाली आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला भारताविरुद्धच्या मालिकेपर्यंत वाट पहावी लागेल. ही त्यांच्यासाठी खरी परीक्षा असेल आणि यावरून आपण ते सध्या कुठे आहेत हे चांगल्या प्रकारे मूल्यांकन करू शकतो.’ भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्स येथे खेळला जाईल. त्यानंतर इंग्लंड अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल, ज्याचा पहिला सामना २१ नोव्हेंबरपासून सुरू होईल.