
ठाणे ः समाजातील प्रत्येक घटकापर्यंत खेळ पोहोचावा आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे ही आपली सामायिक कल्पना होती व आहे असे प्रतिपादन स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी केले.
बॅडमिंटनच्या वाढीबरोबरच क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यावर केआयएएचे अध्यक्ष श्रीकांत वाड व त्यांचे सगळे प्रशिक्षक यांच्या बरोबर प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांची प्रेरणादायी चर्चा झाली. यावेळी चाटे यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत खेळ पोहोचावा आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, ही आपली सामायिक कल्पना होती व आहे.
ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन संघटना, ही खेलो इंडिया मान्यताप्राप्त अकादमी येथे भेट देण्याचा आनंद मिळाला असे पांडुरंग चाटे म्हणाले. अंडर १५ मुलींच्या अंतिम सामन्याला साक्षीदार राहून विजेत्यांचा सत्कार करण्याचा योग आला. या खेळाडूंच्या दमदार कामगिरीतून भारतीय क्रीडेचे उज्वल भविष्य स्पष्ट दिसते. खेळाडूंशी संवाद साधताना त्यांना ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहा आणि तीव्र इच्छाशक्ती व मेहनतीने ते साध्य करा, असा संदेश पांडुरंग चाटे यांनी खेळाडू, त्यांचे पालक व प्रशिक्षक राजू गणपुले, श्रीकांत भागवत व मयूर घाटनेकर, रोहन साळवी यांना दिला.
यावेळी केआयएएचे अध्यक्ष श्रीकांत वाड, तसेच पांडुरंग चाटे यांचे प्रिय मित्र आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू बेनहूर सोलोमन आदी उपस्थित होते. या अविस्मरणीय भेटीसाठी त्यांनी श्रीकांत वाड यांचे आभार मानले.