आला पावसाळा…जीव सांभाळा…

  • By admin
  • June 3, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love
  • राजेश भोसले, जलतरणपटू आणि प्रशिक्षक. 

पावसाळा अद्याप पूर्णपणे सुरू देखील झाला नाही त्यापूर्वीच दररोज किमान दोन जण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडत असल्याच्या बातम्या सतत पंधरा ते वीस दिवसांपासून दररोज वाचावयास मिळत आहेत. म्हणून कृपया स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी केले आहे.

जीवाची लाही-लाही करणारा उन्हाळा संपला. या वर्षी वाढत्या तापमानाने व प्रचंड उष्णतेने सर्व रेकॉर्ड तोडले. वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात बघावयास मिळाले. पण भारतात मात्र या वाढत्या तापमानाचे अधिक परिणाम जाणवले. वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम फक्त मनुष्य जीवनावरच पडला नसून तो संपूर्ण जीवसृष्टी वरील प्राणी मात्रांवर झाला.  तन मन होरपळून काढणारा असह्य असा उन्हाळा कधी एकदा संपतो आणि केव्हा एकदाचा पावसाळा सुरू होतो, पहिल्या पावसाच्या सरी केव्हा अंगावर घेतो असे प्रत्येकाला वाटत होते. कारण पावसाळा म्हणजे चैतन्य, पावसाळा म्हणजे उत्साह, पावसाळा म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टीसाठी उपयोगी, क्षीण घालवणारा, तहान भागवणारा, शेतीसाठी उपयुक्त असा पावसाळा म्हणजे नवजीवन देणारा पावसाळा सुरू झाला आहे.

जून महिना सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणी प्रमाणे घराच्या अंगणात पडणारे पावसाचे थेंब, घराच्या छतावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, हळू हळू गल्ली बोळातून जाताना सुरवातीला लोंढा, पुढे ओढा व नंतर नाला असे अनेक नाले मिळून छोट्या नद्या मोठ्या नदीला जाऊन मिळतात व त्यांना पूर येऊन रुद्र रूप धारण करतात.
सुरुवातीला अल्हाददायक वाटणारा, मनाला प्रसन्न करणारा, प्रफुल्लीत करणारा पाऊस जेव्हा सर्वदूर सतत कोसळतो तेव्हा तो त्याच्या रस्त्यात येणारे खड्डे, डोह, बंधारे, खदाणी, तलाव, सरोवर इत्यादी भरून पुढे वाहू लागतो. सर्व जलस्त्रोत काठोकाठ भरतात. सतत रात्रभर कोसळणारा पाऊस, अवेळी पडणारा पाऊस, बेमोसमी पाऊस, कमी वेळेत जास्त पडणाऱ्या पावसामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी दूरदर्शनवर बघायला मिळते, वृत्तपत्रात वाचायला मिळते की सलगच्या पावसाने नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. कुठे थोडा तर कुठे जास्त
तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

त्यामुळे मोठ मोठ्या खड्ड्यांमध्ये, डोह, खदाण, बंधारे इत्यादी ठिकाणी पाणी साचणे तसेच काही ठिकाणी जास्त पावसामुळे नदी, नाले, आड, विहीर इत्यादी जलप्रवाह प्रवाहित झाले आहेत. थांबून थांबून पडणाऱ्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे आणि सर्वत्र हिरवळ वाढल्यामुळे ताजेतवाने वाटू लागले आहे. पावसामुळे जागोजागी पाणी साचल्यामुळे व निसर्ग फुलून आल्यामुळे आपोआपच सभोवतालचे वातावरण प्रसन्न झाले आहे. असे प्रफुल्लीत करणारे वातावरण प्रत्येकाला आवडते .
आपली पावले सहज निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. डोंगर-दऱ्या खोऱ्यात भटकंती सुरू होते. डब्बा पार्टीचे, निसर्ग सहलीचे आयोजन मित्रमंडळ व परिवारासोबत केले जाते. पण आनंदाच्या भरात निसर्गाच्या सान्निध्यात जलस्त्रोतांजवळ गेल्यावर तेथील पाण्याचा आनंद जरूर घ्या पण अनोळखी जलस्रोतांमध्ये सेल्फी काढण्याचा, रिल्स बनविण्याचा, उतरण्याचा, खेळण्याचा, चालण्याचा, पोहण्याचा मोह टाळा. कारण पावसामुळे अशा जलस्त्रोतांजवळची जागा निसरडी होते, तोल जाणे,
गमंत करताना एकमेकांना ढकलणे, पोहण्यासाठी आग्रह करणे आवर्जून टाळले पाहिजे. आपल्याला त्या जलस्रोतांबद्दल काहीही माहिती नाही, त्याची नैसर्गिक रचना त्याची लांबी-रुंदी-खोली, तसेच त्याच्यात असणारे धोके, त्यामुळे आपण त्या ठिकाणाचा आनंद घ्यावा पण अती उत्साहात, अती आत्मविश्वास दाखवून धोका पत्करू नये.

आपल्याला पोहता येत असेल तरी देखील आपण अनोळखी ठिकाणी पोहण्याचा मोह टाळावा. आपल्याला माहित नसलेल्या अनोळखी अशा नदी, नाले, डोह, खदाण, तलाव, सरोवर, आड, विहीर, बारव, सिंचन प्रकल्प, धबधबा, खाडी, समुद्र इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेची सुंपूर्ण काळजी घेवून त्यांचा आनंद द्यावा.

साचलेल्या तळ्यात-खदाणीत, डोहात, बंधाऱ्यात, वाहत्या नदीच्या पाण्यात, धबधब्याखाली, शेततळ्याजवळ, समुद्राच्या लाटात, सुरक्षित अंतर असावे, काळजी घ्यावी. अती आत्मविश्वास टाळावा. कुणालाही आग्रह करू नये. गमंत-जमंत जीवावर बेतेल असे काहीही करु नये. लाइफ जॅकेटचा उपयोग करावा. होडी किंवा नावेमध्ये बसताना क्षमते पेक्षा जास्त संख्या असू नये.

हे नैसर्गिक जलस्त्रोत आपल्या साठीच आहेत. म्हणून त्यांची भीती दाखवणे किंवा त्यांच्या जवळ तुम्ही जाऊच नका असा नाही. तर त्याचा सर्वोच्च उपभोग घ्या. शक्यतोवर इतरांना सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. घरातील लहान मुले- तरुण मंडळीना वेळोवेळी या संबंधी माहिती द्यावी. अशा वातावरणात आपण फिरायला किंवा सहलीला जाणार असाल तर त्याची संपूर्ण कल्पना आपल्या घरच्यांना द्यावी. वेळीच प्रत्येकाला सावध तर करावेच व शक्य तितक्या लवकरात लवकर आपल्यासह आपल्या संपूर्ण कुटुंबास, मित्र-परिवारास, नातेवाईकांना जलतरण प्रशिक्षित करून द्या आणि आपला अनमोल जीव वाचवा.

आला पावसाळा…जीव सांभाळा…असे आवाहन एमजीएम स्पोर्ट्स क्लबचे जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे व राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे प्रमुख राजेश भोसले यांनी केले आहे. 
(95279 24646)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *