
ठाणे ः महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळांमध्ये पहिलीपासून ‘सैनिकी शिक्षण’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे संपर्कप्रमुख व ठाणे विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पहिली ऐवजी तिसरीपासून सैनिकी शिक्षण मिळावे असे सांगितले.
प्रमोद वाघमोडे म्हणाले की, “शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सैनिकी शिक्षणाबाबत पुढाकार घेतला आहे, हे निश्चित स्वागतार्ह आहे. मात्र पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचे वय, त्यांचा बौद्धिक व भावनिक विकास लक्षात घेता त्या टप्प्यावर सैनिकी शिक्षणाची सुरुवात करणे योग्य ठरणार नाही. त्या वयातील विद्यार्थी अजून वाचन, लेखन, समज यामध्ये प्राथमिक स्तरावर असतात. त्यामुळे त्यांना कला शिक्षणाच्या माध्यमातून शिकवावे लागते.”

वाघमोडे पुढे म्हणाले की, “तिसरीपासून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास थोड्याफार प्रमाणात स्थिर झालेला असतो. त्यामुळे ते शारीरिक शिक्षण व सैनिकी शिक्षणातील शिस्त, शारीरिक कवायती, पोलीस आणि वाहतूक नियम आदी गोष्टी आत्मसात करण्यास अधिक तयार असतात. त्यामुळे सैनिकी शिक्षणाची सुरुवात तिसरीपासून करावी, हीच योग्य दिशा ठरेल.”
दरम्यान, ठाण्यातील श्री मावळी मंडळ हायस्कूल मध्ये तिसरीपासूनच ‘कॅडेट कॉप्स’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सैनिकी, पोलीस, वाहतूक पोलीस यांचे नियम आणि अनुशासनाचे प्रशिक्षण दिले जाते. ही उपक्रमशीलता राबवणारी शाळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील पहिली शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांचा कल या प्रशिक्षणाकडे वाढताना दिसतो आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
प्रमोद वाघमोडे यांनी सैनिकी शिक्षणाचा पाया भक्कम करायचा असेल, तर पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी पूर्णवेळ क्रीडा शिक्षक पदे भरती करणे अत्यावश्यक आहे. सध्या ही पदे काढून टाकण्यात आली आहेत. शिक्षणमंत्री दादांनी या बाबतीत सकारात्मक पाऊल उचलल्यास, हे फक्त देशाच्या संरक्षण क्षेत्रालाच नव्हे तर ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यास देखील मोठा हातभार लागेल असे मत व्यक्त केले आहे.