
इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे चिंता वाढवणारे विधान
मुंबई ः भारतीय क्रिकेट संघ नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला रवाना झाला आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंग्लंडमध्ये १००० धावा केल्यानंतरही विजयाची हमी नाही असे विधान करुन गौतम गंभीर यांनी क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवली आहे.
भारतीय संघ पुन्हा एकदा परदेशी भूमीवर मोठ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्यांचा सामना इंग्लंड संघाशी होईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर २० जून रोजी पहिल्यांदाच संघ त्यांच्याशिवाय पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे कारण या दोघांच्या अनुपस्थितीत संघाची कमान युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. शुभमन गिलला इंग्लंडला जाणाऱ्या कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी ५ जून रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान, गौतम गंभीरने सांगितलेल्या गोष्टी केवळ संघासाठी इशारा देणाऱया नाहीत तर चाहत्यांना चिंता आणि आश्चर्यचकित करू शकतात. माध्यमांशी बोलताना गंभीर म्हणाला, “इंग्लंडमध्ये १००० धावा केल्यानंतरही विजयाची हमी नाही.” गंभीरच्या विधानाचा अर्थ काय?
इंग्लंडमध्ये फक्त मैदानच नाही तर आकाशही भूमिका बजावते
गौतम गंभीर म्हणाला की, इंग्लंडमध्ये खेळताना फक्त मैदानच नाही तर आकाशही खूप महत्त्वाचे असते. गंभीर म्हणाला, “इंग्लंडमध्ये ढग, वारा आणि आर्द्रता खेळाचा मार्ग बदलू शकते. तिथे फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारणे तेव्हाच महत्त्वाचे असते जेव्हा गोलंदाज त्यांच्या गोलंदाजीने २० विकेट्स घेऊ शकतात.”
जेव्हा माध्यमांनी त्याला विचारले की यावेळी इंग्लंड दौऱ्याबद्दल त्याला जास्त दबाव जाणवत आहे का, तेव्हा गंभीर म्हणाला, “जेव्हा मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा नेहमीच दबाव जाणवतो. प्रत्येक मालिकेत, मग ती न्यूझीलंडविरुद्ध असो किंवा इंग्लंडविरुद्ध, वेगळा दबाव जाणवतो.” गंभीर पुढे म्हणाला की प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना खेळासाठी मानसिकरित्या तयार करणे ही त्याची जबाबदारी आहे.
कर्णधार म्हणून गिलची पहिली मोठी परीक्षा
या पत्रकार परिषदेदरम्यान शुभमन गिलने त्याच्या कर्णधारपदाबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, संघाची तयारी चांगली आहे आणि त्यांना या संधीतून बरेच काही शिकायला मिळेल. यावेळी बीसीसीआयने शुभमन गिलची भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी परीक्षा देखील असेल.
भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला असून आता विराट-रोहितशिवाय तरुण कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी रणनीती बनवतो आणि परदेशी भूमीवर नवीन संघासह भारत कसोटी जिंकू शकतो का हे पाहणे बाकी आहे.