क्रीडा क्षेत्राला गतिमान करण्यासाठी माधव शेजुळ यांचे योगदान महत्त्वाचे

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 42 Views
Spread the love

डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर यांचे प्रतिपादन

परभणी ः परभणी जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेले खेळ आणि खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त करण्यासाठी डॉ माधव शेजुळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागील तीन दशकांपासून परभणी जिल्ह्यातील क्रीडा विश्वाला गतिमान करण्यासाठी शेजुळ यांचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे माजी संचालक डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी रविवारी येथे केले.

शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ माधव शेजुळ यांच्या सेवानिवृत्तीच्या औचित्याने सेवा गौरव समितीच्या वतीने आयोजित सेवा गौरव व गौरव ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ॲड अशोक सोनी, प्रमुख पाहुणे खासदार संजय जाधव, प्राचार्य डॉ भागवत कटारे, कवी प्रा इंद्रजीत भालेराव, प्राचार्य डॉ शेख बाबर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, मंगल पांडे, डॉ शरद सूर्यवंशी, डॉ सचिन देशमुख, डॉ भास्कर माने, डॉ प्रदीप देशमुख, डॉ माधव शेजुळ, उत्तरा ताई माधव  शेजुळ यांची उपस्थिती होती.

डॉ पाथ्रीकर पुढे बोलताना म्हणाले की, शेजुळ हे संघर्षातून निर्माण झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण हयातीत क्रीडा क्षेत्रास सर्वोच्य मानून विद्यार्थ्यांना घडवले. गरिबीची जाणीव असल्याने गरीब तसेच दुर्लक्षित विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे महत कार्यही केले असेही ते म्हणाले. 

यावेळी आपल्या मनोगतात प्रा इंद्रजित भालेराव म्हणाले की, प्रा शेजुळ यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्र तसेच खेळाडूंना मानसन्मान मिळवून दिला. मराठवाड्यात जे काम डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकरांनी खेळाडूंसाठी केले, तेच काम पुढे शेजुळ करीत आहेत. क्षमता ओळखून खेळाडूंना मार्ग दाखवणारा वाटाड्या म्हणून शेजुळ यांचा नावलौकिक आहे. ते उत्तम मित्र आणि तत्त्वज्ञ सुद्धा आहेत. आपल्या आजूबाजूला असलेली प्रतिकूलता लक्षात घेऊन यश कसे संपादन करायचं याचं गमक शेजुळ यांना मिळालेला आहे. जगावं कसं याचं तत्त्वज्ञान सांगणारा एक उत्तम माणूस म्हणून शेजुळ नेहमी सर्वांना आपलेसे वाटतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

यावेळी खासदार संजय जाधव यांनी प्रा शेजुळ यांच्या कार्याचा गौरव करीत म्हणाले, प्रा शेजुळ यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून परभणीला क्रीडानगरी म्हणून नावारूपाला आणले. एक चांगला माणूस कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा शेजुळ हे आहेत असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना ॲड अशोक सोनी म्हणाले की, शेजुळ यांचा जन्म बीड जिल्ह्यात झाला असला तरी त्यांनी परभणीस कर्मभूमी केले. त्यांच्या या कार्यक्रमासाठी चार विद्यापीठाचे क्रीडा संचालक उपस्थित राहतात यावरून त्यांच्या कार्याची महती लक्षात येते. त्यांना यश, कीर्ती प्राप्त झाली परंतु त्यांना कधीही अहंकाराने शिवले नाही. त्यांचे पाय जमिनीवर राहिले आहेत. संघर्ष करून यशाला गवसणी घालणारा हा अवलिया शिक्षक सर्वांना नेहमी हवाहवासा वाटतो.  

यावेळी रणजित काकडे संपादित ‘गोदाकाठचा मितवा’ या प्रा शेजुळ यांच्या जीवनावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ माधव शेजुळ यांचा सपत्नीक शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ शेख बाबर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, मंगल पांडे, डॉ शरद सूर्यवंशी, डॉ सचिन देशमुख, डॉ भास्कर माने, डॉ प्रदीप देशमुख, वैशाली पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजीत काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जयंत बोबडे यांनी केले. डॉ राजेश्वर देशमुख यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, खेळाडू तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *