
आदित्य चषक कबड्डी स्पर्धा
पुणे : म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्री़डा संकुल येथे सुरू असलेल्या पहिल्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुलांच्या गटात जळगाव आणि बीड यांच्यात झालेला सामना ४२-४२ असा निर्धारित वेळेत बरोबरीत झाला. यामुळे दोन्ही संघाना १-१ साखळी गुण मिळाले.
मध्यंतराला बीड संघ २३-१८ असा आघाडीवर होता. मध्यंतरानंतर जळगाव संघाने बीडच्या संघाला बरोबरीत रोखले. बीडच्या सोहम भागे व जयेश सपकाळे यांनी सुरेख खेळ केला. जळगावच्या जावेद खाटीक व निखिल वांद्रे यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघाला बरोबरीत नेले. पुणे शहर संघाने सोलापूर संघावर ६३-३२ असा विजय मिळवित आपल्या गटातील पहिला विजय मिळविला. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे ३२-२३ अशी आघाडी होती. पुणे शहर संघाच्या रोहन बिले, आयुष पांडे, वेदांत चव्हाण, याशीर सुतार यांनी आक्रमक खेळ केला. सोलापूरच्या संग्रामसिंग सारक व सक्षम गायकवाड यांनी काहीसा प्रतिकार केला.
सकाळच्या सत्रात झालेले दोन्ही विभागातील सामने एकतर्फी झाले. मुंबई उपनगर पश्चिम संघाने ग गटात लातूरला ६३-३० असे पराभूत करीत साखळीत पहिला विजय नोंदविला. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात ३ लोण देत ३५-१५ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत गुणांचे अर्धशतक पार केले. सुरज यादव, विजयनाथ पाल यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळामुळे हा मोठा विजय शक्य झाला. लातूरचा संतोष घवले बरा खेळला. उपनगर पहिला विजय नोंदवित असताना मुंबई शहराला मात्र पराभवाचा झटका बसला.

नंदुरबारने ह गटात मुंबई शहर पश्चिमचा ६४-१८ असा सहज पाडाव केला. पहिल्या सत्रात दोन लोण देत ३०-अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात आणखी ३ लोण देत ४६ गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मुंबई शहर पश्चिमचा श्रेयस पुल्लरी बरा खेळला. ब गटात पिंपरी चिंचवडेने रायगडला ४५-३० असे, तर इ गटात ठाणे ग्रामीणने नाशिक ग्रामीणला ५९-२७ असे पराभूत करीत आगेकूच केली.
मुलींच्या इ गटात पुणे ग्रामीणने पालघरला ३४-२१ असे पराभूत केले. पहिल्या डावात १२-०९ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याला दुसऱ्या डावात पालघर संघाने कडवी लढत दिली. शेवटी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पुण्याने बाजी मारली. पुण्याकडून सई शिंदे, वर्षा बनसोडे, तनिषा यांच्या संयमी खेळाला जाते. पालघरच्या मनाली चव्हाण, पायल बेळकर यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यासाठी थोडा कमी पडला.
नंदुरबारने ब गटात बीडला ३२-२३ असे नमविले. ज्योतिर्मय शिंदे, संगीता पाटील, वैष्णवी साबळे यांच्या जोशपूर्ण सुरुवातीने लोण देत नंदुरबारने २२-०८ अशी आघाडी घेतली होती. पण विश्रांतीनंतर बीडच्या सिमरन शेख, अश्विनी कोठेकर यांनी आपला खेळ उंचावत नंदुरबार संघाला चांगलेच जेरीस आणले. पण वेळेचे गणित न जुळल्याने पराभवाला सामोरी जावे लागले.
पिंपरी चिंचवड संघाच्या संघाने नांदेड संघावर ५८-२४ असा पराभव करीत आगेकुच केली. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे २९-९ अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या संतोषी थोरवे, डिंपल उडानदिवे, अंजली पॉल यांनी चांगला खेळ केला. नांदेडच्या श्रेया सुडेवड हिने एकाकी झुंज दिली.
रत्नागिरी संघाने सोलापूर संघाचा ५०- १४ असा पराभव करीत सहज विजय मिळविला. रत्नागिरीच्या सलोनी महाडिक सुध्दा शिर्के व गौरी कांबळे यांनी सुरेख खेळ केला. सायंकाळच्या सत्रात अहमदनगर संघाने धुळे संघावर ५९-१४ अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे २७-५ अशी भक्कम आघाडी होती. अहमदनगरच्या ज्ञानेश्वरी ढवन, फौजीया शेख यांनी आक्रमक चढाया केल्या तर श्रेया अडसुळ व वीरा ढोंबरे यांनी पकडी घेतल्या. धुळे संघाच्या साक्षी परमान हिने चांगला खेळ केला.
मुंबई उपनगर पश्चिम संघाने ठाणे ग्रामीण संघावर ५२-३२ असा विजय मिळविला. मध्यंतराला मुंबई उपनगर पश्चिम संघाकडे साक्षी गावडे व कुमकुम सिंग यांनी जोरदार हल्ला करीत विजय साकार केला. तर ईश्वरी डोरा हिने पकडी केल्या. ठाणे ग्रामीण संघाच्या संजना विशे व श्रावणी शेलार यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.