
पाऊस सुरू झाला की सह्याद्रीतील डोंगर रांगा हिरवाईने नाटतात. ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागतात आणि यामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखी उठून दिसते. हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे गर्दीने तुडुंब भरून जातात.
परंतु पावसाळी भटकंती करत असताना ती अत्यंत काळजीपूर्वक करणेही तितकेच आवश्यक आहे. सह्याद्रीतील वाटा पाऊसामुळे निसरड्या होतात, दाट धुके आणि वाढलेल्या गवतामुळे वाट हरवते, घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यामुळे ओढे, नाले, धबधबे यांना मोठ्या प्रमाणात पाणी असते, कधी ढगफुटी सदृश पाऊस होऊन त्या परिसरातील ओढ्याना नद्यांना पूर येतो, गड किल्ल्यांवरील तटबंदीचे दगड निसटून दरड कोसळण्याचा धोका असतो या अशा अनेक धोक्यांपासून सावध राहून भटकंती करणे गरजेचे आहे.

सह्याद्रीमध्ये साहस नक्की करावे पण आतिसहस करून धोका पत्करू नये. मुख्य म्हणजे पावसाळा किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये एकट्याने भटकंती कधीही करू नये. गिर्यारोहकांचे अनेक संघ आजवर सह्याद्रीमध्ये निस्वार्थपणे मदतकार्य करत आहेत. परंतु हे मदतकार्य करताना अति साहसामुळे दुखावलेल्या किंवा मृत पावलेल्या व्यक्तींना बाहेर काढताना अत्यंत दुःख होते. गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संचालित महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो गिर्यारोहक हे मदतकार्य एक सामाजिक बांधिलकी म्हणून करतात आणि हे मदतकार्य करत असताना कित्येकदा या स्वयंसेवकांना स्वतःचा जीव धोक्यात घालूनही कार्य करावे लागते. त्यामुळे निसर्गाचे हे अत्यंत विलोभनीय दृश्य सर्वानी जरूर अनुभवावे, परंतु स्वतःची आणि निसर्गाची काळजी घेऊनच.
पावसाळी पर्यटन करताना काय काळजी घ्यावी व बाहेर पडताना काय गोष्टी पाहून बाहेर पडावे आणि काय तयारी असावी याकरिता अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या महाराष्ट्रातील सर्वोच्च गिर्यारोहण संघटनेने नियमावली जाहीर केली आहे. तरी सर्व पर्यटकांनी पर्यटनासाठी जाताना या सर्व बाबींचा आवर्जून पालन करावे.
पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये भटकंती करताना मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. अनेक वेळा लोक गडकिल्ल्यांवर धोकादायक तटबंदी, बुरुज, कड्यांवर जाऊन सेल्फी घेत आहेत. धबधब्याखाली भिजण्यासाठी जात आहेत. माहित नसलेल्या दुर्गम ठिकाणी भटकंतीसाठी जात आहेत. यामध्ये अनेकजण दुर्घटना ग्रस्त होताना दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये सह्याद्रीचे मनमोहक रूप नक्की पाहिले पाहिजे पण ते करताना धबधबा पाहण्याचा आनंद लांबून घेणे अधिक सुरक्षित असेल. सह्याद्रीतील निसरड्या वाटा, ढासळणाऱ्या दरडी, धुके, धबधबे ओढ्यांचे तीव्र प्रवाह टाळले पाहिजेत. अतिसाहसी किंवा अतिरेक न करता आणि सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास त्याचा जास्त आनंद घेता येईल. सुरक्षित साहसी पर्यटन करण्यासाठी सर्वानी वरील गोष्टींची योग्य काळजी घ्यावी आणि यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे ही विनंती.

- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ (9890620490).