
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययामुळे रायगड रॉयल्स व ईगल नाशिक टायटन्स या दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
गुणतालिकेत ईगल नाशिक टायटन्स संघ ९ सामन्यात ५ विजय, १ पराभव, १३ गुणांसह अव्वल स्थानी असून रायगड रॉयल्स संघ ९ सामन्यात ४ विजय, ३ पराभव, १० गुणांसह तिसऱ्या स्थानी कायम आहेत. त्यामुळे रायगड रॉयल्स संघाचे बाद फेरीत पात्र ठरण्याचे आव्हान कायम आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
पॉवरप्लेमध्ये विकी ओस्तवाल (१३), ऋग्वेद मोरे (६) हे स्वस्तात बाद झाले. सिद्धेश वीर व हर्ष संघवी यांनी तिसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ३७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. हर्ष संघवी १५ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला. त्याने २ चौकार मारले. पाठोपाठ सिद्धेश वीर २९ धावांवर तंबूत परतला. सिद्धेशने १ चौकार व २ षटकार खेचले. त्यानंतर नीरज जोशी नाबाद १६, ओंकार खाटपे ११ धावा केल्या. रायगड रॉयल्स संघ १४ षटकात ६ बाद ११६ धावा अशा स्थितीत असताना पुन्हा पाऊस सुरू झाला. सतत पडत असल्यामुळे पावसामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : १४ षटकात ६ बाद ११६ धावा (सिद्धेश वीर २९, हर्ष संघवी २१, नीरज जोशी नाबाद १६, विकी ओस्तवाल १३, ओंकार खाटपे ११, अक्षय वाईकर ३-२७, अर्शिन कुलकर्णी १-१८, मनोज इंगळे १-१४, मुकेश चौधरी १-२३).