३००६ दिवसांनी करुण नायरचे भारतीय संघात पुनरागमन

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

२०१७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला

हेडिंग्ले ः मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज करुण नायर याची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. तब्बल ३००६ दिवसांनी करुण नायर याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. नायर २०१७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

वर्षानुवर्षे वाट पाहणे संपले आणि अखेर करुण नायरचे पुनरागमन अखेर झाले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याद्वारे उजव्या हाताचा फलंदाज करुण नायर हा ३००६ दिवसांनी म्हणजेच आठ वर्षे, दोन महिने आणि २३ दिवसांनी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. त्याने २०१७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. लीड्समध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी केएल राहुल याने करुण नायरसोबत बराच काळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राहुल म्हणाला की तो नायरच्या भारतीय कसोटी संघात परतण्याबद्दल खूप उत्सुक होता.

राहुल म्हणाला की, करुण नायरसोबत बराच काळ देशासाठी खेळण्याची आशा करतो. ३३ वर्षांचा करुण नायर आणि राहुल हे लहानपणापासूनच वयोगटातील क्रिकेट खेळत आहेत. दोघेही जवळचे मित्र आहेत. राहुल गेल्या काही वर्षांत भारतीय संघाचा अविभाज्य भाग असला तरी, कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावूनही नायरला आठ वर्षे संघाबाहेर ठेवण्यात आले होते.

राहुलने त्याच्या आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मीडिया टीमला सांगितले की, “आम्ही ११ वर्षांच्या वयात एकत्र क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही या प्रवासात आहोत. आमच्या दोघांच्याही आयुष्यात चढ-उतार आले. करुणला संधी मिळाली, त्याने त्रिशतक झळकावले आणि त्यानंतर त्याला अनेक कारणांमुळे कठीण काळाचा सामना करावा लागला.”

देशांतर्गत क्रिकेटमध्ये नायरच्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख करताना राहुल म्हणाला, “पण गेल्या दोन-तीन वर्षांत त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे ती उल्लेखनीय आहे. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि तो भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला. मला आशा आहे की आपण दोघेही बराच काळ भारतीय संघासाठी खेळू’

राहुलने पुन्हा सांगितले की इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला विराट कोहली आणि रोहित शर्माची उणीव भासेल. दोघांनीही गेल्या महिन्यात कसोटीतून निवृत्ती घेतली. ते म्हणाले, ‘विराट आणि रोहित गेल्या दशकापासून भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांची अनुपस्थिती ही एक मोठी हानी असेल. माझ्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत, मी कधीही अशा भारतीय संघात खेळलो नाही जिथे विराट किंवा रोहित नसेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *