गिल युगाचा दमदार प्रारंभ

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love
  • कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल यांची ऐतिहासिक शतके
  • पहिल्या दिवसअखेर भारत तीन बाद ३५९ धावा, इंग्लंड बॅकफुटवर

हेडिंग्ले : भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात दणक्यात झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (१०१) याने धमाकेदार शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली. तसेच कर्णधार शुभमन गिल (नाबाद १२७) याने कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने दोन शतकांच्या बळावर ८५ षटकात ३ बाद ३५९ धावसंख्या उभारली.

इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिरवीगार आणि उसळत्या खेळपट्टीवर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याने कसोटी पदार्पण केले. करुण नायर याने तब्बल ८ वर्षांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले.

यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने संयमी सुरुवात केली. प्रारंभी दोघांनीही इंग्लंडचा वेगवान मारा संयमाने खेळून काढत एक उत्कृष्ट भागीदारी केली. राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने ९१ धावांची भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. ब्रायडन कार्स याने राहुलला ४२ धावांवर बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. राहुलने ७८ चेंडूंचा सामना करत ८ चौकार मारले. कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन (०) धावांचे खाते न उघडता बाद झाला. बेन स्टोक्स याने त्याची विकेट घेऊन भारताला दुसरा धक्का लगेच दिला.

भारतीय संघ दोन बाद ९२ अशा स्थितीत असताना कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एका बाजूने सुरेख फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल ही जोडी चांगली जमली आणि या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करुन संघाची स्थिती भक्कम केली. ही जोडी अधिक धोकादायक बनत असताना स्टोक्स याने प्रभावी गोलंदाजी करत यशस्वी जैस्वाल याला क्लिनबोल्ड केले. यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड भूमीत पहिला डाव खेळताना दमदार शतक ठोकले. यशस्वीने १५९ चेंडूंचा सामना करताना १०१ धावा काढल्या. शतकी खेळी करताना यशस्वीने १६ चौकार व १ षटकार मारला. यशस्वी जैस्वाल हा इंग्लंड भूमीत पहिल्या कसोटीत शतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला. त्याने फारुक इंजिनीयर यांचाही विक्रम मोडीत काढला.

५३व्या षटकात यशस्वी जैस्वाल १०१ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद २२१ अशी होती. कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद १३६ धावांची भागीदारी करुन संघाची स्थिती भक्कम केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ८५ षटकांच्या खेळात तीन बाद ३५९ धावसंख्या उभारुन इंग्लंड संघावर दबाव वाढवला. शुभमन गिल नाबाद १२७ धावांवर खेळत आहे. उपकर्णधार ऋषभ पंत याने आक्रमक फलंदाजी करत १०२ चेंडूत नाबाद ६५ धावा काढल्या. पंतने २ षटकार व ६ चौकार मारले.

शुभमन चौथा कर्णधार ठरला

विजय हजारे (नाबाद १६४, १९५१), सुनील गावसकर (११६, १९७६), विराट कोहली (११५, २०१४) यांच्यानंतर शुभमन गिल (नाबाद ०००, २०२५) हा चौथा कर्णधार ठरला. कर्णधार म्हणून पहिल्याच डावात त्याने शतक ठोकत विक्रमाला गवसणी घातली.

इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटीत शतक झळकावणारे भारतीय फलंदाज

१३३ विजय मांजरेकर हेडिंग्ले १९५२

१२९* संदीप पाटील ओल्ड ट्रॅफर्ड १९८२

१३१ सौरव गांगुली लॉर्ड्स १९९६

१४६ मुरली विजय ट्रेंट ब्रिज २०१४

१०१ यशस्वी जयस्वाल हेडिंग्ले २०२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *