
कुलगुरू लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक : शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ व सशक्त होण्यासाठी प्रत्येकाने नियमित योगासने आणि प्राणायाम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, श्री चैतन्य टेक्नो स्कूल व भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री चैतन्य टेक्नो स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग महोत्सव साजरा करण्यात आला. या योग महोत्सवाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू लेपटनंट जनरल माधुरी कानिटकर समवेत योग विद्याधामचे संस्थापक डॉ विश्वास मंडलिक, प्रति-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, श्री चैतन्य टेक्नो स्कुलच्या प्राचार्या प्रतिक्षा सिंह, श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे व्यवस्थापक विनायक राजगुरू भारतीय योग संस्थानचे दिलीप जाजू आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, योगा फोर वन अर्थ, वन हेल्थ ही यावर्षाच्या योग दिनाची थीम आहे. त्यानुसार घरोघरी योग पोहचावा यासाठी विद्यापीठाकडून योग महोत्सव राबविण्यात आला. या सप्ताहात सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त लोकांपर्यंत योग पोहोचविण्यात आला. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी सर्वांनी योग अभ्यास करणे गरजेचे आहे.
कानिटकर पुढे म्हणाल्या की, धावत्या जीवनशैलीमुळे जीवनात योग शिक्षणाची गरज वाढली आहे. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षणाप्रमाणेच सामुदायिक योग शिक्षणाची पध्दत रुढ होत आहे. आज जगभर योग शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठ, योग शिक्षक या द्वारे योगशिबीरे इत्यादींच्या माध्यमांतून योगाचे धडे दिले जात आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेला हा योग महोत्सव उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी डॉ विश्वास मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या प्रतिक्षा सिंह यांनी उपस्थितांचे आभार मानले. भारतीय योग संस्थान योग शिक्षक बलवीर सिंग वाजवा यांच्या मार्गदर्शनाखाली दंडस्थितीतील आसने, बैठकस्थितीतील आसने, शयनस्थितीतील आसने व प्राणायाम आदी योगप्रकारातील क्रिया करण्यात आल्या. या योग महोत्सवात तीन सत्रात सुमारे १५०० पेक्षा अधिक योग साधकांनी सहभाग घेतला आहे.
योग वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात सूत्रसंचालन श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या विनायक राजगुरु व विद्यापीठाच्या आयुष विभागाच्या प्रमुख डॉ गितांजली कार्ले यांनी केले. या योग वर्गाकरीता विद्यापीठाचे अधिकारी डॉ स्वाती जाधव, डॉ अनुश्री नेटके, डॉ स्वप्नील तोरणे तसेच श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.