
जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी, इंग्लंड सर्वबाद ४६५, भारताची ९६ धावांची आघाडी
हेडिंग्ले : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ४६५ धावांवर रोखून नाममात्र सहा धावांची आघाडी मिळवली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाच विकेट घेऊन महान अष्टपैलू कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात २३.५ षटकात दोन बाद ९० धावा काढून ९६ धावांची आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाला नाममात्र सहा धावांची आघाडी मिळाल्यानंतर शतकवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने डावाची सुरुवात केली. चौथ्या षटकात ब्रायडन कार्से याने यशस्वी जैस्वाल याला अप्रतिम स्वींग चेंडूवर बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. यशस्वी केवळ ४ धावा काढून बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या फक्त १६ होती. पहिल्या डावात या जोडीने ९१ धावांची भागीदारी केली होती.

पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या साई सुदर्शन व राहुल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन याने चिवट झुंज देत ३० धावा काढल्या. त्याने ४८ चेंडूंचा सामना करत ४ चौकार मारले. बेन स्टोक्स याने सुदर्शन याला सापळा रचून बाद केले हे विशेष. २१व्या षटकात स्टोक्स याने ८२ धावांवर भारताला दुसरा धक्का दिला. पावसामुळे पंचांनी खेळ थांबवला तेव्हा भारताने दोन बाद ९० धावा काढल्या आहेत. त्यावेळी केएल राहुल ४७ तर कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर खेळत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ पाहता कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे.
इंग्लंड ४६५ धावांवर ऑल आऊट
पहिल्या डावात इंग्लंडचा संघ ४६५ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे भारताला सहा धावांची आघाडी मिळाली. त्याआधी भारताने ४७१ धावा केल्या होत्या. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला २०९/३ अशा धावसंख्येने सुरुवात केली. त्यावेळी ऑली पोप १०१ आणि हॅरी ब्रुक खाते न उघडता क्रीजवर उपस्थित होते.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने ऑली पोप याला यष्टीरक्षक ऋषभ पंत कडून झेलबाद केले. १३७ चेंडूत १४ चौकारांसह १०६ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर हॅरी ब्रुक आणि बेन स्टोक्सने आघाडी घेतली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी झाली जी मोहम्मद सिराज याने मोडली. त्याने कर्णधार स्टोक्सला पंतकडून झेलबाद केले. ५२ चेंडूत २० धावा काढल्यानंतर तो बाद झाला. यासोबत पंतने कसोटीत १५० झेल पूर्ण केले. तो कसोटीत १५० बळी पूर्ण करणारा तिसरा भारतीय यष्टिरक्षक ठरला.

२७६ धावांवर पाच विकेट गमावलेल्या इंग्लंडला मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. ही गरज ब्रूक आणि जेमी स्मिथने पूर्ण केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८८ चेंडूत ७३ धावा जोडल्या आणि धावसंख्या ३५० च्या जवळ आणली.
प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा गोलंदाजीची जादू पसरवली आणि यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला आपला बळी बनवले. पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर ब्रूक याला वोक्स याने सुरेख साथ दिली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या.
पहिल्या डावात ९९ धावा काढल्यानंतर ब्रूक बाद झाला. त्याचे नववे कसोटी शतक फक्त एका धावेने हुकले. प्रसिद्ध कृष्णाने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, वोक्सला ब्रायडन कार्सने साथ दिली आणि दोघांनी ५५ धावांची भागीदारी केली. सिराज याने कार्सला बाद केले. २३ चेंडूत २२ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. बुमराहने ख्रिस वोक्सला आपला बळी बनवले. तो ५५ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३८ धावा काढल्यानंतर बाद झाला. जोश तांग ११ धावा करू शकला तर शोएब बशीर एक धाव घेऊन नाबाद राहिला.
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात भारताकडून पाच विकेट्स घेतल्या. कसोटीत त्याने १४ व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याच वेळी प्रसिद्ध कृष्णाला तीन आणि मोहम्मद सिराजला दोन विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर रिकाम्या हाताने तंबूत परतले. हॅरी ब्रूक याला शून्यावर जीवदान लाभले नसते तरकसोटीचे चित्र वेगळे असते. बुमराहच्या नो-बॉलमुळे ब्रूकला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा उठवला.
बुमराहची कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहची भीती स्पष्टपणे दिसून येत होती. लीड्सच्या मैदानावर मालिका सुरू होताच, बुमराह पुन्हा एकदा भारतीय संघाच्या उर्वरित गोलंदाजांपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसला. जसप्रीत बुमराहचा घराबाहेरचा हा ३४ वा कसोटी सामना होता ज्यामध्ये त्याने १२ व्यांदा एका डावात ५ बळी घेतले. बुमराह आता घराबाहेर सर्वाधिक ५ बळी घेणारा भारतीय गोलंदाज म्हणून कपिल देव यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.
विदेशात कसोटीत सर्वाधिक ५ बळी घेणारे गोलंदाज
जसप्रीत बुमराह (३४ कसोटी) – १२ वेळा
कपिल देव (६६ कसोटी) – १२ वेळा
अनिल कुंबळे (६९ कसोटी) – १० वेळा
इशांत शर्मा (६२ कसोटी) – ९ वेळा