
अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा ः अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीरची धमाकेदार कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत चुरशीच्या लढतीत अर्शिन कुलकर्णी (७७ धावा) याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरदार ईगल नाशिक टायटन्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.


गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९० धावांचे आव्हान उभे केले. सलामीवीर विकी ओस्तवाल (०) याला नाशिकच्या मुकेश चौधरीने पहिल्याच चेंडूवर झेलबाद करून संघाला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर सिद्धेश वीर आणि हर्ष मोगावीरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूत १११ धावांची शतकी भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला.
हर्ष मोगावीराने ३९ चेंडूत ४८ धावांची खेळी करून सिद्धेश वीर याला सुरेख साथ दिली. हर्षने २ चौकार व ३ षटकार खेचले. त्याचे दोन धावांनी अर्धशतक हुकले. नाशिकच्या कौशल तांबेने हर्ष मोगावीरा याला झेलबाद केले. सिद्धेश वीरने ३८ चेंडूत ५० धावा करून आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर सिद्धेश वीरने नीरज जोशीच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी २९ चेंडूत ४५ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. नीरज जोशी २७ धावा काढून तंबूत परतला. नीरजने १ चौकार व ३ उत्तुंग षटकारांचा मारा केला. सिद्धेश वीरने ५९ चेंडूत नाबाद ९९ धावांची झंझावती खेळी केली. सिद्धेशने ११ चौकार व ४ उत्तुंग षटकार ठोकले.
१९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स संघ ५ षटकात बिनबाद ४३ धावा सुस्थितीत असताना पाऊस सुरू झाला. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर अर्शिन कुलकर्णी व मंदार भंडारी या जोडीने ४२ चेंडूत ६२ धावांची सलामी दिली. मंदार भंडारीने २२ चेंडूत २८ धावा काढून बाद झाला. मंदारने ३ षटकार खेचले. अर्शिनने आक्रमक खेळी करत ३४ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. साहिल पारीख चोरटी धाव काढताना ७ धावांवर धावबाद झाला. पाठोपाठ रायगडच्या तनय संघवीने रोहन दामले (११) याला झेलबाद केले.
त्यावेळी नाशिक संघाला विजयासाठी ३८ चेंडूत ७३ धावांची आवश्यकता होती. अर्शिनने ५३ चेंडूत ७७ धावांची सुरेख खेळी केली. त्याने ५ चौकार व ४ षटकार मारले. रायगडच्या तनयने अर्शिन (७७) याला धावांवर झेलबाद करून नाशिक संघाला मोठा धक्का दिला. नाशिकला विजयाचे समीकरण १४ चेंडूत ३२ धावांची आवश्यकता होती. अथर्व काळे याला दोन वेळा जीवदान मिळाले.
१७.५ षटकात अथर्वला पहिल्याच चेंडूवर नीरज जोशीने जीवदान दिले. त्यानंतर १० धावांवर असताना अथर्वला अजय बोरुडेने पुन्हा जीवदान दिले व हा चेंडू थेट सीमारेषे पलीकडे गेला. रणजीत निकमने १३ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला अथर्व काळेने ७ चेंडूत २३ धावांची धडाकेबाज खेळी करून साथ दिली.
शेवटच्या षटकात ६ चेंडूत ६ धावा असे आव्हान असताना अथर्वने पहिल्याच चेंडूवर मारलेला चेंडू सिद्धेश वीरच्या हाताला लागून सीमा पार गेला व ईगल नाशिक टायटन्स संघाने १९.१ षटकात ४ बाद १९१ धावा करून पूर्ण केले आणि विजेतेपद पटकावले.
५० लाखांचे पारितोषिक
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व ५० लाख रुपये तर, उपविजेत्या संघाला करंडक व २५ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानद सचिव अॅड कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, केशव वझे, अजय देशमुख, कल्पना तापीकर, सीईओ अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, सर्व जिल्हा संघटनेचे सदस्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : २० षटकात ४ बाद १९० धावा (सिद्धेश वीर नाबाद ९९, हर्ष मोगावीरा ४८, नीरज जोशी २७, मुकेश चौधरी २-४२, कौशल तांबे १-३६, प्रशांत सोळंकी १-४२) पराभूत विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स: १९.१ षटकात ४ बाद १९१ धावा (अर्शिन कुलकर्णी ७७, रणजीत निकम नाबाद ३१, अथर्व काळे नाबाद २३, मंदार भंडारी २८, तनय संघवी २-३१, शुभम कदम १-२८). सामनावीर – अर्शिन कुलकर्णी.