एमपीएल स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा 

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सांगता शानदार सोहळ्याने संपन्न झाली. तत्पूर्वी, स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भव्य असा लाईट शो, हेलियम बलून शो व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 
 
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नेत्रदीपक असा सोहळा रंगला. या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, मानद सचिव अ‍ॅड कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, केशव वझे, अजय देशमुख, कल्पना तापीकर, सीईओ अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघ मालक, सर्व जिल्हा संघटनेचे सदस्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर उत्स्फूर्त गर्दी केलेल्या क्रिकेट चाहत्यांशी संवाद साधला. कुठलेही क्षेत्र असले, तरी महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिलेला आहे. देशामधील क्रिकेटमध्ये  राज्याचा मोठा वाटा राहिला आहे. हे या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एमसीएतर्फे आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगला यशस्वी करण्यात खेळाडू, त्यांचे पालक, प्रशिक्षक, एमसीए अपेक्स समितीचे अधिकारी व संस्थेचे कर्मचारी, संघ मालक आणि प्रायोजक या प्रत्येकाचे मी आभार मानतो.  

रोहित पवार पुढे म्हणाले की, एमपीएल लीगमध्ये सहभागी झालेल्या आमचे फ्रॅंचाईजी संघ, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तुम्ही रसिक क्रिकेट चाहते यांच्यामुळेच ही लीग यशस्वी होऊ शकली. अर्थात, यामध्ये आमच्या मैदानावरील कर्मचाऱ्यांना विसरुन चालणार नाही. अनेकदा पावसाचा व्यत्यय आला. पण, अवघ्या काही क्षणात त्यांनी मैदान खेळण्यासाठी सज्ज केले. त्या कर्मचाऱ्यांचाही ही लीग यशस्वी करण्यात मोठा वाटा आहे.

लीगमध्ये खेळणारे खेळाडू यांचे देखिल मी आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्ही ही लीग इतक्या भव्य स्वरुपात घेऊ शकलो असे सांगून रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानाचे महत्व देखिल सांगितले. रोहित पवार म्हणाले, ‘देशात तीनच मैदाने अशी आहेत की जेथे पाऊस पडल्यानंतर पंधरा मिनिटांतं पुन्हा खेळ सुरु करणे शक्य होते. या तीन मैदानात या आपल्या मैदानाचा समावेश होतो. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे येथे पाऊस पडला काय किंवा नाही फरक पडत नाही. येथे सामना पूर्ण होतो.’
 
याआधी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा उस्फुर्तपणे पार पडली. उत्कंठावर्धक अशा अंतिम लढतीत पुणे वॉरियर्स  संघाने सोलापूर स्मॅशर्स संघाचा अवघ्या एका धावेने थरारक विजय नोंदवत पहिले वहिले डब्ल्यूएमपीएल स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले होते. या विजयात संघाची कर्णधार अनुजा पाटीलचा अष्टपैलू कामगिरीचा मोठा वाटा होता. एमपीएल स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स, ४ एस पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या सहा संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *