
छत्रपती संभाजीनगर ः सायकल प्रेमींच्या सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरतर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पर्यावरण पूरक सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. पंढरपूर सायकल वारीचे यंदाचे चौथे वर्ष पूर्ण झाले. या सायकल वारीमध्ये एकूण ५३ वारकरींनी सायकलने ३३० किमी अंतर पार करत पंढरपूरची वारी पूर्ण केली.
या सायकल वारीचा उद्देश झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन असा होता. सर्व वारकरींनी दोन दिवसात ही अविस्मरणीय सायकल यात्रा आनंदाने आणि सुरक्षिततेने पूर्ण केली. वाटेत कडक उन्ह, अवघड घाट, उलट दिशेने वाहणारे वारे, मध्येच जोराचा पाऊस या सर्व गोष्टींवर मात करत सर्व सायकल स्वारांनी वारी पूर्ण केली.
पहिला मुक्काम कुंथलगिरी फाटा येथे १८० किलोमीटर अंतरराव करण्यात आला. दुसरा मुक्काम १५० किमी अंतरावर पंढरपूर येथे केला. तिसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा करून तेथील रेल्वे ग्राउंडवर सायकल रिंगण करण्यात आले. यामध्ये तब्बल ४५०० सायकल स्वारांनी सहभाग घेतला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती होती.
त्यानंतर मनमाडकर महाराज प्रांगणवर अखिल महाराष्ट्र पर्यावरण पूरक सायकल संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे १७ वेळा आयर्नमॅन असलेले, ट्रान्स सैबेरियन रेस पूर्ण केलेले नागपूर येथील डॉ अमित समर्थ हे होते.
डॉ अमित समर्थ यांच्या ९० क्लब मधील प्रमुखांचा आणि विशेष कामगिरी केलेल्या सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. सायकलिस्ट फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे या वर्षी प्रथमच ज्येष्ठ सायकलिस्ट ७५ वर्षांवरील सायकलपटूंसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे यांच्या हस्ते हा पुरस्कार सुरेश उमाठे (वय ८६, नागपूर), भीमराव सूर्यवंशी (वय ८३, सांगली), जयंत सांगवीकर (वय ७८, छत्रपती संभाजीनगर) यांना प्रदान करण्यात आला.
या सायकल वारीचे आयोजन सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी सायकल वारीचे प्रमुख डॉ प्रशांत महाले यांनी अतिशय शिस्तबद्ध व प्रेरणादायक पद्धतीने सायकल वारीचे नियोजन केले. सायकल वारी दरम्यान सायकलस्वारांसाठी वेळेवर भोजन, विश्रांती, मेडिकल सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. सायकल वारी यशस्वी करण्यासाठी डॉ अरुण गावंडे, प्रसाद कोळेकर, जयंत सांगवीकर, मनीष जोशी, मनोज वडगावकर, भगवान मगर, सचिन जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सायकल वारीमध्ये शिवाजी राजे, लक्ष्मण साळुंके, डॉ राम पुंगळे, मल्लिकार्जुन स्वामी, उद्योजक शशिकांत शेळके, लता शिरसाट, शिल्पा भागडे, शुभांगी बोडखे, प्रदीप कोल्हे, भास्कर मुंढे, सुजित सौंदलगेकर, आनंद टर्के, नारायण चकोर, प्रणिता बर्दापूरकर, अश्विनी गजभारे, गजानन पिसे, हेमंत भावसार, सुरेश जाधव, नितीन चरेकर, अॅड शुभांगी मोरे, विश्रांती गायकवाड, श्रद्धा केदार, नुपूर भालेराव, ज्योती राजे, साळुंके, देशपांडे, सदानंद देशपांडे, संजय शिंदे, अनिल अतकरे, वर्षा अतकरे, शरद बोडखे, विकास गायकवाड, राजेंद्र वाणेकर, अनिल टाकळीकर, अमोल चौधरी, अमोल जाधव, रवींद्र आगाशे, सरोज आगाशे, अभिर आगाशे, मीत मापारी, गणेश सहाणे, धनंजय भाले, बाळासाहेब शिंदे यांनी भाग घेतला.
पंढरपूर येथील या सायकलवारीत ३६ जिल्ह्यातील शंभराहून अधिक संघटनांनी व साडेचार हजारांहून अधिक सायकल वीरांनी सहभाग नोंदवला. ही सायकल वारी सायकलप्रेमींसाठी केवळ एक शारीरिक कसरत नव्हती, तर ती एक सामाजिक, आध्यात्मिक व संघ भावनेची अनुभूती होती. फाउंडेशनतर्फे अशा उपक्रमांची भविष्यातही योजना करण्यात येणार असल्याचे डॉ विजय व्यवहारे यांनी सांगितले.