
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण
जळगाव ः गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (२९ जून) आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सह-संस्थापक विनोद बोधनकर, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जळगाव शहरातील शिक्षक, पालक व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने मागील वर्षापासून गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता मूल्याची रुजुवात व्हावी तसेच समाजात स्वच्छता विषयाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १०७ तालुक्यातील २९२ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत सहभागी शाळांनी वर्षभर कोणते उपक्रम राबवावे याबाबत एक मार्गदर्शिका देण्यात आली होती. वर्षभर राबविलेल्या उपक्रमांचे शाळांनी नोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यात स्व-मूल्यमापन केले. या स्वयंमूल्यांकनावर आधारित २० जिल्ह्यातील ३० तालुक्यातील ४६ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाचा सहभाग तसेच राबविलेल्या उपक्रमांची परिणामकारकता, सातत्य यावर मूल्यांकन करण्यात आले होते. या सर्व शाळांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या टीमने प्रत्यक्ष भेट देऊन राबवलेले उपक्रम, त्याची नाविन्यता, परिणामकारकता, विद्यार्थी व शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग व उद्दिष्टपूर्ती याची खात्री करुन पारितोषिक प्राप्त शाळांची निवड करण्यात आली.
जैन हिल्सवरील गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात रविवारी (२९ जून) सकाळी ९.३० वाजता हा सोहळा होणार आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेस एक लाखाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शाळेस रु. एकावन्न हजार, एकतीस हजार व एकवीस हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच अंतिम मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या शाळांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.