
अध्यक्षपदी सुधांशू मित्तल, खजिनदारपदी गोविंद शर्मा यांची बिननिरोध निवड
नवी दिल्ली ः भारतीय खो-खो महासंघाची २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठीची निवडणूक अत्यंत सुसंवादाने आणि बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्राने मोठी घोडदौड करत, महासंघाच्या खजिनदारपदाची तिजोरी आपल्या हाती घेतली आहे. अध्यक्षपदी दिल्लीचे सुधांशू मित्तल तर महासचिवपदी पंजाबचे उपकार सिंह विर्क यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी माजी न्यायाधीश कामिनी लाऊ यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले.
महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार ॲड गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली. याच वेळी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या उपाध्यक्षा अश्विनी पाटील याही सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्या. गेल्या दोन ते तीन कार्यकालानंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा महासंघाचे खजिनदारपद मिळाले असून, कै महेश मेढेकर यांच्या नंतर ही जबाबदारी पुन्हा महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे.
याआधीही ॲड गोविंद शर्मा यांनी भारतीय खो-खो महासंघाच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी (१३ ते १९ जानेवारी २०२५) भारतीय संघाच्या निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे यशस्वीरित्या पार पडली.
ॲड गोविंद शर्मा हे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव, भारतीय खो-खो महासंघाचे कार्यकारी सदस्य असून त्यांनी २०१६ मध्ये महासंघाच्या पुरस्कार समिती सदस्य, खेलो इंडिया स्पर्धेचे विभागीय सदस्य, नेपाळविरुद्ध झालेल्या कसोटीतील प्रशिक्षक, आशियाई स्पर्धेतील तांत्रिक अधिकारी, तसेच गुवाहाटी (२०२३) स्पर्धेतील निवड समिती सदस्य अशा अनेक भूमिका यशस्वीरित्या निभावल्या आहेत. २०१६ पासून ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड समिती सदस्य म्हणून सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा उत्कृष्ट संघटक पुरस्कार, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (छत्रपती संभाजीनगर) यांसह अनेक मानसन्मान मिळाले आहेत.
त्यांच्या आणि अश्विनी पाटील यांच्या या निवडीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस डॉ चंद्रजित जाधव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष समीर मुळे, सचिन गोडबोले, आमदार डॉ जितेंद्र आव्हाड, आमदार अनिकेत तटकरे, महेश गादेकर, अशोक पितळे, आमदार अभिमन्यू पवार, ग्रीष्मा पाटील, माजी सरचिटणीस संदीप तावडे, डॉ राजेश सोनावणे, डॉ पवन पाटील, जयांशु पोळ, बाळासाहेब तोरसकर, वर्षा कच्छवा आदी मान्यवरांनी मन:पूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी
अध्यक्ष – सुधांशू मित्तल (दिल्ली), उपाध्यक्ष – भवर सिंह पलारा (राजस्थान), कल्याण चॅटर्जी (पश्चिम बंगाल), कमलजीत अरोरा (छत्तीसगड), लोकेश्वर (कर्नाटक), एम मधुसूदन सिंह (मणिपूर), एम सीता रामी रेड्डी (आंध्रप्रदेश), प्रद्युमना मिश्रा (ओडिशा), राजीब प्रकाश बारुआ (आसाम)
महासचिव – उपकार सिंह विर्क (पंजाब), खजिनदार – गोविंद शर्मा (महाराष्ट्र), सहसचिव – ए नेल्सन सॅम्युएल (तामिळनाडू), एल आर वर्मा (हिमालय), संजय यादव (मध्य प्रदेश), सुनील नाईक (गोवा).
कार्यकारी सदस्य – अमरीन्द्र पाल सिंग (जम्मू अँड काश्मीर), अनुप चक्रवर्ती (सिक्कीम), अॅथलेट कमिशन – अश्विनी बिपीन पाटील (महाराष्ट्र). कार्यकारी सदस्य – बिजन कुमार दास (पश्चिम बंगाल), गुरचंद सिंग (पंजाब), अॅथलेट कमिशन – मोनिका, कार्यकारी सदस्य – बिजन कुमार दास (पश्चिम बंगाल), एमव्हीएसएस प्रसाद (आंध्र प्रदेश), नीरज कुमार (बिहार), एन कृष्णमुर्थी (तेलंगणा), प्रमोद कुमार पांड्ये (दादरा अँड नगर हवेली), पुटो बुई (अरूणाचल), रजत शर्मा (उत्तरांचल), संजीव शर्मा (चंदिगड), संतोष प्रसाद (झारखंड), सूर्य प्रकाश खत्री (दिल्ली).