
२०० वा टी २० सामना खेळताना भारताची इंग्लंडवर ९७ धावांनी मात; स्मृती मानधनाचे स्फोटक शतक
नॉटिंगहॅम : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली २०० वा टी २० सामना खेळताना भारतीय संघाने इंग्लंड संघाचा ९७ धावांनी पराभव केला. पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
स्मृती मानधनाने स्फोटक शतक साजरे करुन इंग्लंडसमोर विजयासाठी २११ धावांचे मोठे आव्हान ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. डॅनिएल व्याट हॉज (०), सोफिया डंकले (७) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट हिने एका बाजूने आक्रमक अर्धशतक ठोकत सामन्यातील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट पडत होत्या. टॅमी ब्यूमोंट (१०), एमी जोन्स (१), अॅलिस कॅप्सी (५), एम आर्लांट (१२), सोफी एक्लेस्टोन (१), लॉरेन फाइलर (१) यांना स्वस्तात बाद करत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व प्राप्त केले. कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट हिने ४२ चेंडूंत ६६ धावांची चमकदार अर्धशतकी खेळी केली. श्री चरणी हिने तिला बाद करत संघाचा विजय निश्चित केला. या लढतीत नॅट सायव्हर ब्रंटचा अपवाद वगळता इंग्लंड संघ भारतीय फिरकी गोलंदाजी आत्मविश्वासाने खेळू शकला नाही. इंग्लंडचा डाव १४.५ षटकात अवघ्या ११३ धावांत गडगडला. भारतीय संघाने तब्बल ९७ धावांनी सामना जिंकून मालिकेची सुरुवात मोठी शानदार केली आहे.
भारताकडून श्री चरणी हिने १२ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. दीप्ती शर्मा (२-३२) व राधा यादव (२-१५) यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलला. अमनजोत कौर (१-२२), अरुंधती रेड्डी (१-१८) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताची दमदार फलंदाजी
भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार आणि स्फोटक शतक झळकावले. महिला टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. मानधनाने ५१ चेंडूत शतक झळकावले आणि हरमनप्रीत कौरनंतर जलद क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये फक्त दोन भारतीयांनी शतके झळकावली आहेत.
भारताने २११ धावांचे लक्ष्य दिले
हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्मृती मानधनाने या सामन्यात शानदार कामगिरी केली आणि ६२ चेंडूत १५ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या. तिच्या दमदार खेळीच्या मदतीने भारतीय महिला संघाने २० षटकांत पाच गडी बाद २१० धावा केल्या. सराव सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्यामुळे भारताची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर सावधगिरी म्हणून या सामन्यात खेळत नाहीये. त्यामुळे मानधनाने ही जबाबदारी सांभाळली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मानधना सुरुवातीपासूनच लयीत दिसत असताना, शेफाली संघर्ष करताना दिसत होती.
मानधना-शेफालीची २१ व्यांदा ५० प्लस धावांची भागीदारी
शेफालीच्या संथ फलंदाजी नंतर देखील मानधना आणि शेफाली या सलामी जोडीने हा विक्रम आपल्या नावावर केला. मानधना आणि शेफाली यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या सलामी जोडीने ५० प्लस धावांची भागीदारी करण्याची ही २१ वी वेळ होती. या दोघांव्यतिरिक्त, कोणीही इतक्या वेळा ५० प्लस धावांची सलामी भागीदारी केलेली नाही. शेफाली आणि मानधनाने या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि बेथ मुनी यांना मागे टाकले, ज्यांनी २० वेळा ५० प्लस धावांची भागीदारी केली आहे. मानधना आणि शेफाली यांनी मिळून ७८ डावांमध्ये ३६.१७ च्या सरासरीने तीन शतके आणि १५ अर्धशतकांसह २७१३ धावा केल्या आहेत.
भारताकडून मानधना व्यतिरिक्त हरलीन देओलने ४३ धावा आणि शेफाली वर्माने २० धावा दिल्या. इंग्लंडकडून लॉरेन बेलने तीन तर एम आर्लॉट आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी एक विकेट घेतली.