
मुंबई ः हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत ‘खेलो तायक्वांदो अकॅडमी’च्या आयुष सपकाळ आणि स्वराज सकपाळ या दोन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली.
आयुष सपकाळने १७ वर्षांखालील ४८ किलो वजनी गटात, तर स्वराज सकपाळने १४ वर्षांखालील ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. आयुष याने उपांत्य फेरीत दिल्लीच्या खेळाडूवर तर अंतिम सामन्यात बंगळुरूच्या खेळाडूला आरामात पराभूत केले. स्वराज यानेही गुजरातच्या खेळाडूला उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात बिहारच्या खेळाडूविरुद्ध थरारक विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
आयुष हा सध्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. तो गेली ८ वर्षे तायक्वांदोचे धडे गिरवत आहे. स्वराज हा आयईएसविएन सुळे स्कूल, दहिसर येथील नववीचा विद्यार्थी असून तोही पाच वर्षांपासून तायक्वांदो खेळात चमक दाखवत आहे. या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून ‘खेलो तायक्वांदो अकॅडमी’सह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.या दोघांना प्रशिक्षक राजेश मुराव, तुषार पाटील आणि कार्तिके नायडू यांचे मार्गदर्शन मिळत आहे.