
नवी दिल्ली ः आरसीबी संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महिलेने त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. त्याच्याविरुद्ध इंदिरापुरम पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिताने यापूर्वी एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली (आयजीआरएस) द्वारे तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिस तपास करत होते. पीडितेने तक्रारीत सांगितले होते की तिची इंटरनेट माध्यमांद्वारे यश दयालशी मैत्री झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. पण यशने लग्नाचे आश्वासन देऊन तिला फसवले. पीडितेने पोलिसांना अनेक पुरावे देखील दिले होते.
यश दयाल २०२२ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तो त्याच्या पहिल्या दोन हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळला होता. तेव्हा तो चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना, त्याने केकेआरविरुद्ध शेवटच्या षटकात ३० धावा दिल्या, तेव्हा रिंकू सिंगने त्याच्या षटकात पाच षटकार मारले. त्यानंतर त्याची खराब कामगिरी पाहून गुजरात टायटन्सने त्याला सोडले.
आयपीएल २०२४ च्या लिलावात आरसीबी संघाने त्याला ५ कोटी रुपयांना खरेदी केले. आरसीबी संघासोबतची त्याची कामगिरी आणखी चांगली झाली आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याने आरसीबी संघासाठी एकूण १३ बळी घेतले आणि विजेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत ४३ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने एकूण ४१ बळी घेतले आहेत. यशने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने २७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ८४ बळी घेतले आहेत. याशिवाय, २३ लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ३६ बळी आहेत.