
दुबई ः हँडशेक प्रकरणानंतर आता गन सेलिब्रेशन चर्चेचा विषय बनला आहे. गन सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहान याने याविषयावर हास्यापद प्रतिक्रिया दिली आहे. अर्धशतकानंतर मला वाटले म्हणून गन सेलिब्रेशन केले. याकडे लोक कसे पाहतात याची मला पर्वा नाही असे फरहान याने सांगितले.
सोमवारी पत्रकार परिषदेत गन सेलिब्रेशनबद्दल विचारले असता, फरहानने निर्लज्जतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि हास्यास्पद उत्तर दिले. त्याने बालिश उत्तर दिले, “लोक काय विचार करतात याची मला सहसा पर्वा नसते. त्यावेळी तो फक्त एक मूड होता. मी सहसा ५० धावा केल्यानंतर सेलिब्रेशन करत नाही, पण अचानक मला असे वाटले की आज मी काहीतरी वेगळे करावे, म्हणून मी ते केले. लोक ते कसे घेतील याची मला पर्वा नाही.” तो पुढे म्हणाला की, आपल्यासमोर कोणताही संघ असला तरी आक्रमक क्रिकेट खेळणे महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, “हे फक्त भारताविरुद्ध नाही; तुम्ही प्रत्येक संघाविरुद्ध आक्रमक क्रिकेट खेळले पाहिजे.”
पॉवरप्लेवर लक्ष केंद्रित करा
पुढे जाण्यासाठीच्या त्याच्या रणनीतीवर चर्चा करताना, फरहान म्हणाला की संघाला पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. तो म्हणाला, “गेल्या काही सामन्यांमध्ये, आम्ही पॉवरप्लेचा योग्य वापर करत नव्हतो आणि लवकर विकेट गमावत होतो. भारताविरुद्ध, आम्ही पहिल्या १० षटकांत ९० धावा केल्या, जे सकारात्मक आहे. मधल्या षटकांमध्ये घसरण झाली होती, परंतु आम्ही सुधारणा करू.”
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
फरहानच्या विधानावर आणि बंदुकीच्या इशाऱ्यावर सोशल मीडियावर मतभेद आहेत. काही चाहते याला फक्त एक उत्सव म्हणत आहेत, तर अनेक भारतीय चाहते ते “प्रक्षोभक” आणि “अयोग्य” म्हणत आहेत. काहींनी फरहानची खिल्ली उडवली आहे.