बॅडमिंटन खेळातील तपस्वी…मनोहर गोडसे

  • By admin
  • November 2, 2025
  • 0
  • 61 Views
Spread the love

सुहास जोशी, ज्येष्ठ क्रीडा‌ पत्रकार.

बॅडमिंटन आणि मनोहर गोडसे यांचे एक अतुट नात आहे. जे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुटू शकत नाही. बॅडमिंटन हा जणु काही गोडसे यांचा श्वास आहे असेच म्हणावे लागेल. वयाच्या ८६  व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या गोडसे यांनी तब्बल सहा दशकांपेक्षा जास्त काळ या खेळाची निस्पृहपणे खूप मोठी सेवा केली आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. सुरुवातीला‌ २० वर्षे खेळाडू म्हणून या खेळात त्यांनी योगदान दिले. तर त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा प्रशिक्षणाकडे वळवला. मग युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी मनोरा बॅडमिंटन अकादमीची स्थापना केली. या अकादमीच्या माध्यमातून त्यांची बॅडमिंटन सेवा आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे हे विशेष.

१९९७ पासुन मनोरा बॅडमिंटन अकादमीतर्फे युवा खेळाडूंसाठी बॅडमिंटन स्पर्धांचे नियमित आयोजन केले जाते. आतापर्यत अकादमीने तब्बल ११७ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. गोडसे सरांची सहा दशकांची वाटचाल सोपी‌ नव्हती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितिवर मात करीत त्यांनी या खेळाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. रायगड येथील पेण जवळील वरसर्ई या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिथे चौथीपर्यंत त्यांचे  शालेय शिक्षण झाले. तिथे असताना बॅडमिंटन खेळाची त्यांना फारशी माहिती देखील नव्हती. या खेळाचे “स्पेलिंग” देखील त्यांना माहिती नव्हते. त्यांचे चौथी‌पर्यंत शालेय शिक्षण झाल्यानंतर गोडसे कुंटुंबियांनी आपला मुक्काम‌‌ मुंबईत हलवला. 

गोडसे कुटुंबीय‌ माटुंगा येथील लोकमान्य नगर येथे राहण्यास आले. त्यांच्या लोकमान्य नगरात मातीचे बॅडमिंटन कोर्ट होते. तेथे मोठी मंडळी नियमित बॅडमिंटन खेळात असत. त्यांचा खेळ बघून छोटा मनोहर बॅडमिंटन खेळाच्या प्रेमात पडला. मोठ्या मंडळीचे खेळून झाल्यानंतर ती खराब झालेली शटल “कॉक्स” तिथेच कोर्टच्या बाजुला टाकून देत असत. मग गोडसे यांचे छोटे सवंगडी ती शटल “कॉक्स‌” उचलत आणि‌ टेबल टेनिसच्या बॅटने खेळायचा जोरदार प्रयत्न करायची. मोठ्या मंडळीत साठे नावाचे गृहस्थ चांगले खेळायचे. ते स्प्रिंग साठे या टोपण‌ नावाने ओळखले जायचे. मनोहर यांना त्यांच्यापासून या खेळाची स्फूर्ती मिळाली. 

सुरुवातीला त्यांचे मार्गदर्शन मनोहरला मिळाले. गोडसे यांच्या घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. मध्य रेल्वे बॅडमिंटन क्लबमध्ये प्रवेश मिळवण्याची मनोहरची खूप इच्छा होती. प्रवेश फी अवघी सहा रुपये होती. पण तेव्हा वडिलांकडे पैसे मागण्याचे धाडस मनोहरकडे नव्हते. त्यामुळे क्लबमध्ये प्रवेश घेण्याचे गोडसे यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. कॉलेजात देखील ते गेले नाहीत. एसएससी झाल्यानंतर लगेचच गोडसे यांनी वयाच्या १९ व्या वर्षी कुर्ला येथील प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी धरली. तिथे त्यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. मग त्यांनी मागे वळून बघितलं नाही. 

आपल्या स्पर्धात्मक बॅडमिंटनची त्यांनी काहीशी उशिरा सुरुवात केली. तरी देखील त्यांनी जिल्हा स्तरापासून ते अखिल भारतीय, राष्ट्रीय पातळीवरील बऱ्याच स्पर्धा नरेश नार्वेकर यांच्या साथीत जिंकल्या. अगदी बॅडमिंटन विश्वातील प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत देखील वयस्कर गटात गोडसे यांना भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर हे गोडसे यांचे दैवत. प्रत्यक्ष नाटेकर यांच्या सोबत दुहेरीत खेळण्याची संधी मिळाल्याबदल गोडसे स्वतःला भाग्यवान समजतात. या जोडीने तेव्हा राज्यात चांगल्याच फॉर्मात असलेल्या गौतम ठक्कर, आसिफ पारपिया जोडीला नमवण्याचा पराक्रम केला होता.

स्पर्धात्मक खेळाला विराम दिल्यानंतर आपण या खेळाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी आपला मोर्चा वयाच्या ३५ व्या वर्षी प्रशिक्षणाकडे वळवला. अनेक युवा खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले. मार्गदर्शन केले. माजी राष्ट्रीय विजेता अमोल शहा, प्रख्यात स्पोर्ट्स मेडिसीन तज्ञ डॉक्टर आनंद जोशी, माजी राज्य विजेता विक्रांत पटवर्धन यांना गोडसे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्या काळात बॅडमिंटनच्या फार कमी स्पर्धा होत असत. त्यामुळे युवा, होतकरू खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची खुप कमी संधी मिळायची. ही गोष्ट गोडसे यांच्या लक्ष्यात आली. या युवा खेळाडूंसाठी काही तरी करायला हवे याच विचारातून मग त्यांनी मनोरा बॅडमिंटन अकादमीची स्थापना वयाच्या ५६ व्या वर्षी जानेवारी १९९६ मध्ये केली. अॅव्होकेट मंजुळा राव, सीए अशोक राव यांच्या मदतीने या अकादमीचा श्री गणेशा झाला.

सुरवातीला १०, १३, १६ वर्षांखालील वयोगटातील मुला, मुलींसाठी सामने होत असत. आता मात्र वयोगटात बदल झाला असून ९, ११, १३, १५, १७ वर्षाखालील मुला, मुलींच्या वयोगटात सामने खेळवण्यात येतात. अकादमीची सुरवातीपासुन सदस्य फी अवघी ५१ रुपये होती. ती आजतागायत‌‌ कायम आहे. फक्त स्पर्धा फी प्रत्येकाकडून‌ ५०० रुपये घेतली जाते. १९९७ मध्ये झालेल्या पहिल्या मनोरा स्पर्धेत अवघ्या ५२ खेळाडूंचा सहभाग होता. आज हिच सहभागी खेळाडूंची संख्या ५०० च्या पुढे गेली आहे. हे अकादमीचे मोठे यश आहे.

कोणाची फारशी आर्थिक मदत नसताना, नियमित पुरस्कर्ते नसताना केवळ बॅडमिंटन खेळावरील प्रेमापायी स्वतःच्या खिशाला चाट देऊन मनोहर गोडसे हा मनोराचा डोलारा सांभाळत आहेत. कुठल्या ही बॅडमिंटन संघटनेकडून आतापर्यंत त्यांनी आर्थिक मदत घेतली नाही. परंतु गौतम आश्रा, महेश मारू, मुलुभाई इर्शद, प्रदिप गंधे, माधव पिट्टी, गौतम ठक्कर, डॉ रणजीत नागपाल‌, श्रीकांत वाड यांचे मोलाचे सहकार्य‌ अकादमीसाठी गोडसे यांना मिळाले. त्याचबरोबर माटुंगा जिमखाना, एनएससीआय, बॉम्बे जिमखाना, सीसीआय, विलिंग्डन जिमखाना, नॉर्थ इंडियन असोसिएशन, खार जिमखाना यांनी बऱ्याच वेळा विनाशुल्क अकादमीच्या स्पर्धांना आपले बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध करुन दिले. सुरवातीला मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई येथील युवा खेळाडू अकादमीच्या स्पर्धेत भाग घेत असत. परंतु आता राज्यभरातून खेळाडू या अकादमीच्या स्पर्धेत भाग घेत आहेत.

साधारण वर्षाला ४-५ स्पर्धांचे आयोजन अकादमीतर्फे करण्यात येते. या सर्वाचे उत्तम नियोजन गोडसे सर स्वतः जातीनीशी लक्ष्य घालून करत असतात. याच स्पर्धेत खेळुन जिशनु संन्याल, सुश्रुत‌ करमरकर, भागिरथी शर्मा, अजय जयराम, अक्षय‌ देवळेकर, हर्षील दाणी, सिमरन सिंग, वैष्णवी अय्यर, प्राजक्ता सावंत, तन्वी लाड, अदिती मुटाटकर या खेळाडूंची मजल पुढे राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत गेली. भारताचे नामवंत बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि या खेळातील त्यांचे दैवत असलेल्या नंदू नाटेकर यांनी गोडसे यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन त्यांची पाठ थोपटली होती. 

या खेळातील गोडसे यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे माजी खासदार स्व प्रकाश परांजपे, दैनिक हिंदुस्तान टाईम्स, स्व मनोहर विचारे प्रतिष्ठान, बॅडमिंटन फोर्टी फाईव्ह, जीएमबीए, प्रख्यात बाँम्बे जिमखान्याने गोडसे यांचा खास गौरव  केला होता. तर ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. दहावीपर्यंत  शिकले असताना देखील प्रीमियर ऑटोमोबाईल सारख्या मोठ्या कंपनीत गोडसे अकाऊंट ऑफिसर पदापर्यंत पोचले. या खेळात जे काही आजवर मिळाले त्याबाबत ते पूर्ण समाधानी आहेत. बॅडमिंटन खेळाने समाजात गोडसे यांना वेगळी ओळख मिळवून दिली. 
मोठ्या मित्र परिवाराशी ते जोडले गेले. त्यांच्या या खडतर वाटचालीत पत्नी माधवी, चिरंजीव जयंत या दोघांची मोठी साथ मिळाली. येवढे मोठे योगदान देऊन देखील गोडसे यांचे पाय जमिनीवरच आहेत. मितभाषी स्वभाव असणाऱ्या आणि काहीसे कमी बोलणाऱ्या गोडसे यांचा या वयातील उत्साह आजच्या युवा खेळाडूंना लाजवणारा आहे. आपला स्वतःचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. या खेळातील अनेकांची त्यांच्याविषयी आदरयुक्त भावना आहे. भविष्यात गोडसे यांचा हा बॅडमिंटनचा मनोरा अधिक, अधिक मोठी उंची गाठेल अशी आशा करुया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *