
मोहम्मद शमी नंतर जसप्रीत बुमराहची दुखापत डोकेदुखी
नवी दिल्ली : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. मोहम्मद शमी नंतर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे भारतीय क्रिकेट संघाचे असे गोलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संघाचे यश अवलंबून आहे. मात्र दुखापतींमुळे हे दोन्ही वेगवान गोलंदाज संघासाठी चिंतेचे कारण बनले आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत बुमराहच्या दुखापतीने मोठा प्रश्न निर्माण केला होता. त्याचबरोबर शमीही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. अशा स्थितीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत दोन्ही गोलंदाजांच्या सहभागाबाबत शंका अधिक गडद झाली आहे.
मोहम्मद शमी
मोहम्मद शमीने २०२४ मध्ये रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. परंतु त्याच्या गुडघ्याच्या समस्येमुळे तो पुन्हा बाहेर पडला. त्यामुळेच त्याला बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले नाही आणि विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळू शकला नाही. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शमी बंगालसाठी परतला तेव्हा त्याची कामगिरी बऱ्यापैकी झाली होती. त्याने १-२८ आणि १-४० अशी आकडेवारी नोंदवली.
मोहम्मद शमीबद्दल असे वृत्त होते की तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आपला दावा भक्कम करू शकतो. परंतु तज्ञांचे मत आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत त्याने मैदानात परत येऊ नये. त्याच्या घाईघाईने परतल्यामुळे दुखापतीची समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो.
भारताचे स्वप्न डगमगणार?
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले तर भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असेल. मात्र, बीसीसीआयने या दोन खेळाडूंना परत आणण्याची घाई करू नये. ते पूर्णपणे तंदुरुस्त होण्याआधी त्यांना खेळण्यास भाग पाडणे संघासाठी हानिकारक ठरू शकते.