
नीरज चोप्रा पुन्हा धूम ठोकण्यासाठी होणार सज्ज
नवी दिल्ली : भारतात खेळाचे नवे पर्व सुरू होत असून २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याचे ध्येय भारताने ठेवले आहे. दरम्यान, देशात मोठ्या भालाफेक स्पर्धेची घोषणा झाल्याने क्रीडापटूंमध्ये उत्साहाची भावना निर्माण झाली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया या वर्षाच्या अखेरीस भारतातील मोठ्या स्टार खेळाडूंसोबत भालाफेक स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रा देखील सहभागी होताना दिसेल.
पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने भारतातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत स्पर्धा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नीरज म्हणाला, ‘भारतातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत स्पर्धा करणे हे माझे स्वप्न आहे. आशा आहे की, लवकरच भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करेल आणि मी त्याचा भाग होऊ शकेन.’ कदाचित नीरजचे हे स्वप्न अजून पूर्ण होणार नाही, पण भारतातील भालाफेक स्पर्धेचा स्वतंत्र कार्यक्रम त्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिला जाऊ शकतो.
नीरज चोप्राचे सलग दुसरे सुवर्ण हुकले
नीरज चोप्राने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर अंतर कापून भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने पूर्वीपेक्षा जास्त अंतर कापले, पण यावेळी त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यावेळी त्याला पराभूत करणारा दुसरा कोणी नसून पाकिस्तानचा अर्शद नदीम होता.
पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ८९.४५ मीटर भालाफेक केली होती. पण तो अर्शद नदीमचा ९२.९७ मीटरचा आकडा पार करू शकला नाही. याच कारणामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण त्याने इतिहास नक्कीच रचला होता आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीरजच्या दोन ऑलिम्पिक खेळांमध्ये मिळालेल्या यशामुळे भारतातील तरुणांमध्ये ॲथलेटिक्सबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.