
बाळासाहेब तोरसकर
नवी दिल्ली ः खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने ब्राझील संघावर ६४-३४ अशा प्रभावी विजयासह नॉकआउट फेरीकडे वाटचाल केली.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेला हा सामना रोमांचक क्षणांनी भरलेला होता. भारत आणि ब्राझील दोन्ही संघांनी आपल्या कौशल्याचा अप्रतिम खेळ केला. मात्र भारताने शेवटच्या टप्प्यात आपल्या सामर्थ्याचा ठसा उमटवला.
ब्राझीलची आक्रमक सुरुवातब्राझीलने पहिल्या टर्नमध्ये आक्रमक सुरुवात करत १६ गुण मिळवले. मात्र, भारताने ड्रीम रन दरम्यान दोन महत्त्वाचे गुण मिळवत ब्राझीलवर दबाव निर्माण केला आणि सामन्याचा पाया मजबूत केला. दुसऱ्या टर्नमध्ये भारताचा जोरदार खेळ केला. भारतीय संघाने आक्रमणात आघाडी घेतली. रोकेसन सिंग, पबानी साबर, आणि आदित्य गणपुले यांनी जबरदस्त खेळ करत भारतासाठी ३६ गुण मिळवले. यामुळे भारताने मोठी आघाडी घेतली.

ब्राझीलचा झंझावात तिसऱ्या टर्नमध्ये ब्राझीलने जोरदार पुनरागमन केले. मॉरो पिंटो, जोएल रॉड्रिग्स, आणि मॅथ्यूस कोस्टा यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, विशेषतः कोस्टाने सहा टच पॉइंट मिळवले. ब्राझीलने या टप्प्यात ३४ गुण मिळवत सामन्यात रंगत निर्माण केली.
अंतिम टर्नमध्ये भारताची निर्णायक कामगिरीचौथ्या टर्नमध्ये भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले. आदित्य गणपुले आणि कर्णधार प्रतीक वाईकर यांनी संघासाठी जोरदार कामगिरी करत विजय टप्प्यात आणला. रोकेसन सिंगने स्काय डाइव्हमधून चार गुण मिळवले, तर मिहुलने दोन टच पॉइंट मिळवत भारताचा विजय सुनिश्चित केला. सामन्याचा शेवट ६४-३४ असा झाला आणि भारताने बाद फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली.
सामन्याचे पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अटॅकर : पबानी साबर (भारत)
सर्वोत्कृष्ट डिफेंडर : मॅथ्यूस कोस्टा (ब्राझील)
सर्वोत्कृष्ट खेळाडू: प्रतीक वाईकर (भारत)