विक्रमी धावसंख्येसह भारतीय महिला संघाने मालिका जिंकली

  • By admin
  • January 15, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

आयर्लंड महिला संघावर ३०४ धावांनी विजय 

राजकोट : कर्णधार स्मृती मानधना (१२५) आणि प्रतिका रावल (१५४) यांच्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंड महिला संघाविरुद्ध ४३६ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. हा सामना भारतीय महिला संघाने तब्बल ३०४ धावांनी जिंकला. 

महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आहे. महिला संघाने राजकोटमध्ये महिला एकदिवसीय इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली. भारताने आयर्लंडसमोर विजयासाठी ४३६ धावांचे लक्ष्य ठेवले. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी धमाकेदार कामगिरी करत भारतीय संघासाठी शतक झळकावले. प्रतिका रावल हिने १५४ धावांची दमदार खेळी केली. तसेच रिचा घोष हिनेही महत्त्वाची भूमिका बजावली.

राजकोट एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, मानधना आणि प्रतिका यांनी डावाची सुरुवात केली. दोघींनीही भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. मानधना आणि प्रतिका यांच्यात २३३ धावांची भागीदारी झाली. मानधनाने ८० चेंडूंचा सामना करत १३५ धावा केल्या. तिने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. मानधाना नंतर प्रतिका रावल हिने तिचे पहिले शतक पूर्ण केले.

प्रतिका रावलची १५४ धावांची धमाकेदार खेळी 
मानधनासोबत प्रतिकानेही भारतीय संघासाठी चमत्कार केला. तिने १२९ चेंडूंचा सामना करत १५४ धावा केल्या. प्रतिकाच्या खेळीत २० चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. प्रतिका आणि मानधना यांच्यात २३३ धावांची भागीदारीही झाली.

भारतीय महिला संघाने विक्रमी कामगिरी केली. भारतीय संघाने ५० षटकांत ५ गडी गमावून ४३५ धावा केल्या. अशाप्रकारे, आयर्लंडला ४३६ धावांचे लक्ष्य देण्यात आले. रिचा घोष हिने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४२ चेंडूंचा सामना करत ५९ धावा केल्या. यादरम्यान तिने १० चौकार आणि १ षटकार मारला. तेजल हसबनीस हिने २५ चेंडूंचा सामना करत २८ धावा फटकावल्या. हरलीन देओलने १५ धावांची खेळी केली.

भारताने ७२ तासांत स्वतःचाच विक्रम कसा मोडला
वास्तविक, भारतीय संघाने १२ जानेवारी रोजी आयर्लंडविरुद्ध ३७० धावांचा डाव खेळला होता. ही भारतीय संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती. पण आता सुमारे ७२ तासांनंतर ४०० हून अधिक धावा झाल्या आहेत. भारतीय संघाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

आयर्लंड संघासमोर विजयासाठी तब्बल ४३७ धावांचे मोठे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंड संघ ३१.४ षटकात १३१ धावांत सर्वबाद झाला. सारा फोर्ब्स हिने सर्वाधिक ४१ धावा काढल्या. ओर्ला प्रेंडरगास्ट हिने ३६ धावांचे योगदान दिले. 

भारतीय संघाकडून दीप्ती शर्मा हिने चमकदार कामगिरी बजावत २७ धावांत तीन विकेट घेतल्या. तनुजा कंवर हिने ३१ धावांत दोन बळी मिळवले. साधू (१-२२), सायली सातघरे (१-२४), मिन्नू मणी (१-२२) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयासह भारतीय महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *