
मुंबई : भारतीय संघातील खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळले नाही तर त्यांचा पगार कापला जाणार आहे. तसेच आयपीएल खेळण्यावर बंदी घालण्यात येईल असा नवा नियम बीसीसीआयने आणला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा पराभव झाल्यानंतर बीसीसीआय खूप ‘गंभीर’ झाले आहे. एक नवीन १० कलमी धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामध्ये खेळाडूंना आतापासून पाळावे लागणारे १० नियम आहेत. संघात शिस्त, एकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हे केले जात असल्याचे सांगितले जात आहे. पण असा एक नियम आहे. त्यामुळे खेळाडूला पगार कपात आणि आयपीएलमधून बंदी अशा शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की आता सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य असेल. याशिवाय अनेक कडक नियमही जारी करण्यात आले आहेत. जर कोणत्याही खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले तर त्याला शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही बोर्डाने दिला आहे. एका नवीन नियमात म्हटले आहे की, ‘जर एखादी गंभीर परिस्थिती किंवा समस्या उद्भवली तर, एखादा विशिष्ट खेळाडू मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्त्याची परवानगी घेतल्यानंतरच या नियमाबाहेर वागू शकतो. जर असे केले नाही तर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.’
आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी
बीसीसीआयचे म्हणणे आहे की, सर्व खेळाडूंना बोर्डाने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धेत खेळणे बंधनकारक असेल, ज्यामध्ये आयपीएलचाही समावेश असेल. जर एखादा खेळाडू या नियमाचे उल्लंघन करताना आढळला तर त्याला बोर्डाकडून त्याच्या पगारात कपात, त्याच्या सामन्याच्या मानधनात कपात किंवा आयपीएल बंदी देखील लागू शकते.
२३ जानेवारीपासून रणजी ट्रॉफी सामन्यांची पुढील फेरी सुरू होत असताना हे नियम लागू झाले आहेत. ऋषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासह अनेक प्रसिद्ध खेळाडू आपल्या देशांतर्गत संघाकडून खेळतील हे जवळजवळ निश्चित दिसते, परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.