
महिला, पुरुष गटात अंतिम फेरीत नेपाळ संघाशी आज सामना
बाळासाहेब तोरसकर

नवी दिल्ली ः पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारत आणि नेपाळ या दोन्ही संघांनी महिला व पुरुष गटात अंतिम फेरी गाठून एक नवा इतिहास लिहिला आहे. दोन्ही संघांना दुहेरी मुकुट पटकावण्याची संधी आहे. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही गटात एकाच देशाचे संघ आमने-सामने झुंजताना प्रथमच चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे.

पुरुष संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करून जरी अंतिम फेरीत स्थान मिळवले असले तरी त्यांना दक्षिण आफ्रिकेने कडवी लढत दिली. भारताने जरी हा विजय साकारला असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंना विजयासाठी झुंजविले. हा सामना भारताने ६०-४२ असा १८ गुणांनी जिंकला.
आज मैदानात खो देण्यापासून ते खेळाडू बाद करण्यापर्यंत दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सूर मारताना दिसले. खुंट मारताना काही वेळा भारतीय खेळाडूंना कळलेच नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन कळत होते. त्यांच्या खेळाडूंचा वेग वाखाणण्यासारखा होता. या वेगाच्या जोरावरच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पहिल्या डावात २० तर दुसऱ्या डावात २२ गुण असे ४२ गुण मिळवत भारतीय संघाला कडवी लढत दिली. हाफ कामाला भारताकडे २८-२० अशी फक्त ८ गुणांची आघाडी होती.
तिसऱ्या टर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेने आक्रमणाचा वेग वाढवत २२ गुण मिळवले. अशी कामगिरी या विश्वचषकात इतर संघांना जमलेली नव्हती.
चौथ्या टर्नमध्ये भारताने १.५० मि. दक्षिण आफ्रिकेची पहिली तुकडी बाद केली तर पुढच्या ३३ सेकंदात दुसरी तुकडी बाद करून सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तिसरी तुकडीने १.४६ मि. संरक्षण करत लढत दिली. पण चौथ्या तुकडीला भारताने फक्त २२ सेकंदात बाद करून पहिल्या डावातील उट्टे काढले. तर पाचवी तुकडीने १.३१ मिनिटे मैदानात तग धरत पुन्हा एकदा सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला.
या सामन्यात भारताच्या प्रतीक वाईकर (४ गुण), आदित्य गनपुले (१ मि. संरक्षण ६ गुण), मोहित, सचिन भार्गो, अनिकेत पोटे (४ गुण) , गौतम एम. के. (१.२९ मि. संरक्षण व १० गुण) व निखील बी. सुयश गरगटे (१.०६ मि. संरक्षण) यांनी विजयात महत्वाची कामगिरी करत विजय साकारला.
सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू
सर्वोत्कृष्ट आक्रमक: बोंगानी म्ट्स्वेनी (दक्षिण आफ्रिका)
सर्वोत्कृष्ट बचावपटू: सचिन भार्गो (भारत)
सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू: गौतम एम.के. (भारत)
भारतीय महिला संघाचा मोठा विजय
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठून एक नवा इतिहास लिहिला आहे. जागतिक खो-खो विश्वात सुवर्णाक्षरांनी कामगिरी नोंदवण्यासाठी भारतीय संघाला आता केवळ एक विजयाची गरज आहे. दुसरीकडे नेपाळ संघाने दोन्ही गटात अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने कमालीच्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे भारताचे अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न सहज शक्य झाले. पहिल्या डावातच भारताने आपले इरादे दाखवून देत प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेला सळो की पळो करून सोडले. या सामन्यात दोन्ही डावात भारताने प्रत्येकी ५ असे १० ड्रीम रन गुण मिळवत दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. आज पुन्हा एकदा प्रियांका इंगळेने (४ गुण) खो-खो विश्वचषकाचे आम्हीच दावेदार आहोत हे दाखवून दिले. पंजाबचे राज्यपाल महामहीम गुलाबचंद कटारिया यांनी हा सामना पाहण्याचा आनंद लुटला. भारताने हा सामना ६६-१६ (मध्यंतर ३३-१०) असा ५० गुणांनी जिंकला.
भारतीय संघाने सामन्याला दमदार सुरुवात केली. चैत्रा बी. यांच्या अद्वितीय ड्रीम रनमुळे संघाने पहिल्या टप्प्यात मजबूत पकड मिळवली. नाझिया बिबी आणि निर्मला भाटी यांना दक्षिण आफ्रिकेच्या बचावपटूंनी टिपल्यानंतरही चैत्राने एकटीने ५ गुण मिळवले. मात्र, अखेर सिनेतेंबा मोसिया यांनी तिला बाद केले. या ड्रीम रनने भारताने दक्षिण आफ्रिकेच्या ८ गुणांच्या जवळ जाण्याची तयारी केली.दुसऱ्या
दुसऱ्या टर्नमध्ये रेश्मा राठोड यांनी आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना बाद करण्यात मोठी कामगिरी केली. तिची ही कामगिरी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. या टर्ननंतर भारतीय संघ ३३-१० अशा आघाडीवर होता.
तिसऱ्या टर्न मध्ये भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ड्रीम रन साकारला. वैष्णवी पवार, नसरीन शेख, आणि भिलर देवी यांनी सलग ५ मिनिटे मैदानावर उत्कृष्ट खेळ करत ५ गुण मिळवले. या टर्न नंतर स्कोअर ३८-१६ असा झाला, ज्यामुळे अंतिम सात मिनिटांमध्ये भारतीय संघाची पकड मजबूत झाली.
दक्षिण आफ्रिकन संघाच्या तुकड्यांनी चौथ्या टर्न मध्ये केवळ १ मिनिट ४५ सेकंद टिकाव धरला. नसरीन शेख (२.०५ मि. ८ गुण) आणि रेश्मा राठोड (६ गुण) यांनी शानदार खेळ करत सामना भारताच्या बाजूने ६६-१६ असा संपवला. आता भारतीय महिला संघ रविवारी (१९ जानेवारी) नेपाळ विरुद्ध अंतिम लढतीसाठी मैदानात उतरणार आहे.
नेपाळ दोन्ही गटात अंतिम फेरीत
महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात नेपाळने युगांडावर ८९-१८ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर पुरुष गटाच्या सामन्यात देखील नेपाळने इराणवर ७२-३० अशी मात केली. नेपाळने हाफ टाइमला ३५-८ अशी निर्विवाद आघाडी घेतली होती.
सामन्याचे पुरस्कार
- सर्वोत्तम आक्रमक : सिनेतेंबा मोसिया (दक्षिण आफ्रिका)
- सर्वोत्तम संरक्षक : निर्मला भाटी (६ गुण, भारत)
- सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू : वैष्णवी पवार (२.१५ मि. संरक्षण व ६ गुण, भारत)