भारतीय महिला संघाचा सलग चौथा विजय

  • By admin
  • January 26, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

१९ वर्षांखालील महिला विश्वचषक : बांगलादेश संघाचा आठ विकेटने पराभव 

कोलालंपूर : गोलंदाज वैष्णवी शर्माच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला अंडर १९ संघाने टी २० विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला. या सामन्यात वैष्णवीने १५ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. सुपर सिक्स टप्प्यात बांगलादेशला २० षटकांत ८ बाद ६४ धावांवर रोखल्यानंतर भारताने ७.१ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले आणि आठ गडी राखून विजय मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना, सलामीवीर त्रिशा गोंगाडीने ३१ चेंडूत आठ चौकारांसह ४० धावा काढत भारताचा विजय निश्चित केला. पॉवरप्लेमध्ये ती बाद झाली तेव्हा संघाला जिंकण्यासाठी फक्त पाच धावांची आवश्यकता होती. त्यानंतर सानिका चालके (नाबाद ११) आणि कर्णधार निक्की प्रसाद (नाबाद ५) यांनी सावध खेळ केला आणि ७७ चेंडू शिल्लक असताना संघाला आरामदायी विजय मिळवून दिला. तथापि, सुरुवातीपासून दबावाखाली असताना बांगलादेश संघाने भारताविरुद्ध या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

त्याआधी, भारताच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिज (४४) आणि मलेशिया (३१) यांना ५० पेक्षा कमी धावांत बाद केल्यानंतर श्रीलंकेला ९ बाद ५८ धावांवर रोखले होते. व्हीजे जोशिता (१/६) आणि शबनम शकील (१/७) यांनी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या परिस्थितीचा फायदा घेत कसून गोलंदाजी केली कारण बांगलादेशने नऊ धावांत तीन विकेट गमावल्या. अर्धा संघ २२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर जन्नतुल मौआ (१४) आणि कर्णधार सुमाया अख्तर (नाबाद २१) यांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करत बांगलादेशला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. ही भागीदारी वैष्णवीने मौआला बाद करून मोडली. या दोघांशिवाय बांगलादेशच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्रिशाच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला लक्ष्याचा पाठलाग करण्यास कोणतीही अडचण आली नाही. भारतीय संघ मंगळवारी सुपर सिक्स टप्प्यातील पुढील सामन्यात स्कॉटलंडचा सामना करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *