
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांमधील शत्रुत्व कोणापासूनही लपलेले नाही. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांचे संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येतात तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. भारत आणि पाकिस्तानचे संघ आता फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांसमोर येतात. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्याची मोठी उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.
क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत असतात. २०१२-१३ हंगामापासून दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. आता दोन्ही संघ लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकमेकांसमोर येतील. हा सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेटेस्ट रिव्हलरी : इंडिया विरुद्ध पाकिस्तान’ नावाची मालिका प्रदर्शित होणार आहे. त्याचा पहिला भाग ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल. यापूर्वी, एक ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. त्यामध्ये माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली १९९६ च्या ‘फ्रेंडशिप कप’बद्दल बोलताना दिसतो.
गांगुलीच्या विधानावर अख्तरची प्रतिक्रिया
व्हिडिओमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली असे म्हणतात की, ‘हा फक्त नावापुरता मैत्रीचा दौरा होता, पण जेव्हा शोएब अख्तर ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणार आहे, तेव्हा त्यात मैत्री कुठे आहे?’ आता गांगुलीच्या या विधानावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक्सवर लिहिले की, ‘दादा, तुम्ही महान आहात.’ तुमच्याशिवाय भारतीय क्रिकेट अपूर्ण आहे.
पाकिस्तानने मालिका ३-२ अशी जिंकली
फ्रेंडशिप कपमध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. ही मालिका तटस्थ ठिकाणी खेळवण्यात आली होती. कॅनडामध्ये खेळलेली ही मालिका पाकिस्तानने ३-२ ने जिंकली होती. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करत होता तर पाकिस्तानचे नेतृत्व वसीम अक्रम करत होता.