रोहित-कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मोठी भूमिका बजावतील : गौतम गंभीर 

  • By admin
  • February 2, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

मुंबई : भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा फॉर्म सध्या हरवलेला आहे. रणजी सामन्यातही विराट व रोहित अपयशी ठरले. तरीही आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित आणि विराट हे मोठी भूमिका बजावतील असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केला आहे. 

गौतम गंभीर बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. यावेळी गंभीर म्हणाला, ‘मला वाटतं की रोहित आणि कोहली दोघांचाही ड्रेसिंग रूममध्ये खूप प्रभाव आहे आणि भारतीय क्रिकेटमध्येही त्यांचे महत्त्व खूप जास्त आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान हे दोघेही मोठी भूमिका बजावणार आहेत. मी आधीही सांगितले आहे की दोघेही धावा करण्यासाठी उत्सुक आहेत आणि देशासाठी खेळू इच्छितात. दोघांनाही देशासाठी खेळण्याची आणि काहीतरी साध्य करण्याची आवड आहे.’

गंभीर म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान संघाला एक क्षणही आराम करणे परवडणारे नाही. कारण एकदिवसीय विश्वचषकाच्या तुलनेत त्यांना फक्त तीन लीग स्टेज सामने खेळावे लागत आहेत. मुख्य प्रशिक्षक गंभीर म्हणाले की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी हे एकदिवसीय विश्वचषकापेक्षा पूर्णपणे वेगळे आव्हान आहे. कारण जवळजवळ प्रत्येक सामना करा किंवा मरो असा असतो कारण या स्पर्धेत तुम्ही कुठेही थांबू शकत नाही. त्यामुळे आशा आहे की आपण स्पर्धेची सुरुवात चांगली करू कारण जर तुम्हाला पुढे जायचे असेल आणि स्पर्धा जिंकण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पाच सामने जिंकावे लागतील.’

२३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबतही गंभीरने आपले मत व्यक्त केले. भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी या सामन्याबाबतच्या प्रचाराला फारसे महत्त्व दिले नाही. गंभीर म्हणाला, ‘तुमचा सर्वात महत्त्वाचा सामना २३ फेब्रुवारी रोजी होईल असा विचार करून तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीला जात नाही आहात. मला वाटते की पाचही सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आमचे ध्येय फक्त एक सामना नाही तर दुबईला जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे आहे. जर हा या स्पर्धेतील महत्त्वाचा सामना असेल तर आम्हाला तो नक्कीच जिंकायचा असेल आणि शक्य तितक्या गांभीर्याने घ्यायचा असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा दोन देश किंवा भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा भावना नेहमीच उंचावलेल्या असतात परंतु स्पर्धा तीच राहते.’

सूर्यकुमार यादवचे कौतुक 

गंभीरने भारतीय टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. कोहली आणि रोहित सारख्या अनुभवी खेळाडूंनी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने संघाला चालना दिली. जेव्हा आपण निस्वार्थीपणा आणि निर्भयतेबद्दल बोलतो तेव्हा मी आणि सूर्या एकाच पानावर असतो,‘ असे गंभीर म्हणाला.

गंभीरने टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी काय उपयुक्त आहे हे देखील स्पष्ट केले. तो म्हणाला, मला वाटते या टी २० संघाचा पाया दोन तत्वांवर आधारित होता. ते म्हणजे निःस्वार्थपणे आणि निर्भयपणे खेळणे. ड्रेसिंग रूममध्ये आम्हाला हेच हवे आहे आणि या तरुण खेळाडूंनी खरोखरच चांगला प्रतिसाद दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *