
नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ, रिव्ह्यू पाहून निर्णय घेण्याची मागणी
अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने पंचांनी विरोधात निर्णय दिला म्हणून पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथही मारली. या घटनेचे क्रीडा क्षेत्रात पडसाद उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समोर घडलेली कुस्ती आखाड्यातील ही घटना सर्वात चर्चेचा विषय बनली आहे.
महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात थेट लढत झाली. त्यामध्ये सामन्यात पंचांनी शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय घेतला आणि पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. त्यामुळे राग अनावर झालेल्या शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथही मारली. आपले दोन्ही खांदे टेकली नव्हते, पाठही टेकली नव्हती. तरीही आपल्याला पराभूत केले. रिव्ह्यूचा निर्णयही ऐकून घेण्यात आला नाही असा आरोप शिवराज राक्षे याने केला.
आपले दोन्ही खांदे टेकले नव्हतेच, कुस्तीही चितपट झाली नाही. तरीही पंचांनी आपल्याला पराभूत घोषित केले. म्हणूनच रागाच्या भरात त्यांना लाथ मारली अशी प्रतिक्रिया पैलवान शिवराज राक्षे याने दिली. मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईन म्हणूनच मला जाणूनबुजून पराभूत करण्यात आले. पंचांनी आपल्यावर अन्याय केला असा आरोप शिवराज राक्षे याने केला.
निर्णय मान्य नाही प्रशिक्षकाची भूमिका
दुसरीकडे शिवराज राक्षे याच्या प्रशिक्षकाने पंचांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, कुस्तीत दोन्ही खांदे टेकले असते तर शिवराज पराभूत झाला असता. तसे असते तर मी स्वतः त्याला बाजूला नेले असते. पण पंचाच्या निर्णयावर अपील देणे गरजेचे होते. टीम रेफ्रीने स्क्रीनवरती पाहून निर्णय देणे गरजेचे होते. आम्हाला हा निर्णय मान्य नाही.’
सामना पुन्हा होऊ शकतो का?
या सामन्याच्या निर्णयाच्या रिव्हयूची मागणी शिवराज राक्षेने केली आहे. रिव्ह्यू घेतला गेला आणि त्याचे दोन्ही खांदे टेकले नसतील तर पुन्हा एकदा कुस्ती घेतली जाऊ शकते. रिव्ह्यू घेण्याचा अधिकार हा प्रत्येक स्पर्धकाचा अधिकार आहे. तो पंचांनी मान्य केला पाहिजे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचे दिसून आले. पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केले.
यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचे दिसून आले. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.