
सोलापूर : इंदिरा गांधी स्टेडियमवर महाराष्ट्र आणि त्रिपुरा रणजी सामना अखेर अनिर्णित राहिला. पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र संघाने बाजी मारली असून महाराष्ट्र संघाला ३ गुण तर त्रिपुराला १ गुण मिळाले. महाराष्ट्राने आपल्या गटात १७ गुण मिळविले आहेत. महाराष्ट्रकडून पहिल्या डावात दमदार शतक ठोकणाऱ्या सिद्धेश वीर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
चौथ्या दिवशी २ बाद १३५ धावसंख्येवरून त्रिपुराने आपला दुसरा डाव पुढे सुरू केला. चौथ्या षटकात संकर पॉल (८) हितेश वाळुंजकडून त्रिफळाचीत झाला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार मनदीपसिंग फलंदाजीला आला तेव्हा मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करत त्याची स्वागत केले. काहीशा जखमी अवस्थेत फलंदाजी करत मनदीप याने श्रीदाम पॉल याला सुरेख साथ दिली. दोघांनी ८३ धावांची भागीदारी केली. श्रीदाम याने १२८ धावांची शानदार खेळी साकारली. त्याला सोळंकी याने बाद केले.
त्यापाठोपाठ एम बी मुरा सिंग (२) देखील हितेश वाळुंजच्या गोलंदाजीवर बाद झाला. तेव्हा त्रिपुराची धावसंख्या ५ बाद २५७ अशी होती. मनदीप सिंग हा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होता. पुन्हा खेळ सुरू झाल्यावर श्रीनिवास शरथने नाबाद ३७ फटकावल्या. मनदीप याने संयमी अर्धशतक पूर्ण केले. चहापानाला अद्यापी ३० मिनिटे शिल्लक असताना दोन्ही कर्णधारांनी संमतीने खेळ थांबविण्याबदल पंचांना सांगितले. तेव्हा मनदीप नाबाद ७७ धावांवर होता.
महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळुंज याने १०६ धावांत दोन बळी घेतले. रामकृष्ण घोष, प्रदीप दाढे व प्रशांत सोळंकी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.