ऑस्ट्रेलियाविरुद्ध काही गोष्टी चांगल्या कराव्या लागतील ः रोहित शर्मा 

  • By admin
  • March 3, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

वरुण चक्रवर्तीच्या शानदार कामगिरीचे कर्णधाराकडून कौतुक 

दुबई ः आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांच्याविरुद्ध उपांत्य सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी काही गोष्टी सुधाराव्या लागतील असे सांगत कर्णधार रोहित शर्मा याने वरुण चक्रवर्तीच्या शानदार कामगिरीचे कौतुक केले. 

न्यूझीलंड संघाला पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धांमध्ये चांगला खेळण्याचा इतिहास आहे. त्या दिवशी आपल्याला गोष्टी आपल्या नियंत्रणात आणाव्या लागतील. त्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. कमी सामन्यांसह अशा स्पर्धेत गती कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो. चुका होतात पण त्या दुरुस्त करणे महत्वाचे आहे.

रोहित म्हणाला की, संघासाठी न्यूझीलंडवर विजय मिळवून आपल्या मोहिमेचा शेवट उच्च पातळीवर करणे महत्त्वाचे होते. श्रेयस अय्यरच्या ७९ धावांच्या जोरावर भारताने नऊ बाद २४९ धावा केल्या आणि त्यानंतर न्यूझीलंडला २०५ धावांत गुंडाळले. वरुण चक्रवर्तीने १० षटकांत ४२ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. रोहित पुढे म्हणाला, आमच्यासाठी शिखरावर पोहोचणे खूप महत्वाचे होते. न्यूझीलंड हा एक चांगला संघ आहे आणि अलिकडच्या काळात त्यांची कामगिरी चांगली झाली आहे.

वरुणचे कौतुक 
रोहितने भारताच्या विजयाचे श्रेय वरुण चक्रवर्तीच्या पाच विकेट्स आणि श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल (४२) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी ९८ धावांच्या भागीदारीला दिले. रोहित म्हणाला की, पहिल्या पॉवर प्लेमध्ये विकेट गमावल्यानंतर अक्षर-श्रेयस मधील भागीदारी महत्त्वाची होती. त्याने संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. आम्हाला या धावसंख्येचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास होता. वरुणकडे काहीतरी वेगळे आहे, आम्हाला पहायचे होते की तो या परिस्थितीत काय करू शकतो. पुढच्या सामन्यात आपल्याला संघ निवडीचा विचार करावा लागेल. पण ते चांगले डोकेदुखी ठरेल.

वरुणने शमीला टाकले मागे 
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा हा पहिलाच सामना होता आणि तो चमक दाखवण्यात यशस्वी झाला. पाच विकेट्स घेत त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मागे टाकले. शमी याने २००५ मध्ये दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध ५३ धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पदार्पणात सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या नावावर आहे. त्याने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५२ धावा देत सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्याच वेळी, या स्पर्धेत कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाच्या नावावर आहे. त्याने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३६ धावा देऊन पाच विकेट घेतल्या होत्या.

सामनावीर वरुण चक्रवर्ती म्हणाला, सुरुवातीला मी घाबरलो होतो. मी भारतासाठी जास्त एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत, त्यामुळे मी घाबरलो होतो. सामना जसजसा पुढे सरकू लागला तसतसे मला बरे वाटू लागले. विराट, रोहित, श्रेयस, हार्दिक, सगळे माझ्याशी बोलत होते. या खेळपट्टीवर चेंडू जास्त वळत नव्हता पण मी योग्य क्षेत्रात गोलंदाजी केली आणि त्यामुळे मदत झाली. कुलदीप, जडेजा, अक्षर यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती अद्भुत होती.

सँटनर याने केले श्रेयसचे कौतुक
या सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार सँटनर म्हणाला की, भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात मधल्या षटकांमध्ये सामना चांगल्या प्रकारे नियंत्रित केला. या स्पर्धेत आम्ही आतापर्यंत खेळलेल्या खेळपट्टीतील ही सर्वात हळू खेळपट्टी होती. मधल्या षटकांमध्ये भारताने चांगले नियंत्रण दाखवले. श्रेयसने चांगली फलंदाजी केली आणि हार्दिकने शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा केल्या. आम्हाला वाटले होते त्यापेक्षा जास्त वळणे मिळत होती. भारताकडे चार उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होते ज्यामुळे आमच्यासाठी गोष्टी कठीण झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *