विराटच्या मागणीनुसार बीसीसीआय नियमांत बदल करणार

  • By admin
  • March 19, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच परदेश दौऱ्यावर कुटुंबासह प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठीचे नियम बदलू शकते. भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घालवण्यासाठी बोर्डाची परवानगी घ्यावी लागेल. विराट कोहली याने कुटुंबियांसोबत प्रवास करण्याची मागणी केली होती. विराटच्या मागणीचे अनेकांनी समर्थन केले. आता बीसीसीआयने या नियमात बदल करण्याचे ठरवले आहे.

अलिकडेच माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने परदेश दौऱ्या दरम्यान कुटुंबाची उपस्थिती मर्यादित ठेवण्याच्या नियमावर आपले मत व्यक्त केले होते. विराटने म्हटले होते की जेव्हा एखादा खेळाडू दौऱ्यादरम्यान वाईट काळातून जात असतो, तेव्हा त्या वेळी कुटुंबातील सदस्याची भूमिका महत्त्वाची बनते.

वृत्तसंस्था एएनआयने बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत किती कालावधीसाठी प्रवास करू शकतात यासंबंधीचा नियम बोर्ड बदलू शकते. दौऱ्यावर असताना खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवण्यासाठी बोर्डाची परवानगी घ्यावी लागेल.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन धोरणे आखली होती. याअंतर्गत, ४५ दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंचे कुटुंबीय जास्तीत जास्त दोन आठवडे त्यांच्यासोबत राहू शकतात. यापेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यांवर, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त एक आठवडा सोबत ठेवू शकतात.

बीसीसीआयच्या या नियमा बद्दल बोलताना स्टार फलंदाज विराट कोहलीने आरसीबीच्या कार्यक्रमादरम्यान सांगितले की, जेव्हा तुम्ही बाहेर असता आणि तुमच्यासोबत काहीतरी चांगले चालत नसते तेव्हा त्या वेळी तुमच्या कुटुंबासोबत असणे किती महत्त्वाचे असते हे लोकांना समजावून सांगणे खूप कठीण आहे. याचा किती परिणाम होतो हे लोकांना समजले आहे असे मला वाटत नाही.

कोहली म्हणाला की, मला याबद्दल खूप निराशा वाटते कारण असे दिसते की खेळाडूंसोबत जे घडत आहे त्याच्याशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांना मध्यभागी आणले जाते आणि आघाडीवर ठेवले जाते. त्यांना या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारले तर, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नेहमी तुमच्यासोबत ठेवायचे आहे का? तुम्हाला उत्तर हो असे मिळेल, कारण मला खोलीत एकटे बसून दुःखी व्हायचे नाही. मला सामान्यपणे जगायचे आहे. मग तुम्ही तुमचा खेळ खरोखरच जबाबदारी म्हणून घेऊ शकता. तुम्ही ती जबाबदारी पार पाडा.

नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी सारख्या खेळाडूंचे कुटुंब देखील दुबईमध्ये होते पण ते भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये थांबले नव्हते. कुटुंबाचा खर्च बीसीसीआयने उचलला नाही तर खेळाडूंनी स्वतः केला.

संतुलित दृष्टिकोन हवा ः कपिल देव

माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या परदेश दौऱ्या दरम्यान कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्याच्या नियमावर आपले मत मांडले आहे. या बाबतीत संतुलित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे असे त्यांचे मत आहे. आमच्या काळात, क्रिकेट बोर्डाने नाही तर आम्ही स्वतः ठरवले होते की दौऱ्याचा पहिला टप्पा क्रिकेटला समर्पित करावा तर दुसरा टप्पा कुटुंबासोबत वेळ घालवण्यात घालवावा. यामध्ये संतुलन असायला हवे असे कपिल देव यांनी सांगितले. तसेच कपिल देव म्हणाले की, मला वाटतं हा क्रिकेट बोर्डाचा निर्णय आहे. मला वाटतं तुम्हाला कुटुंबाची गरज आहे पण तुम्हाला नेहमी संघासोबत असण्याचीही गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *