
मुंबई : स्पेनमधील पाल्मा डे मॉलओरका शहरात नुकत्याच झालेल्या विश्व केटलबेल स्पर्धेत मुंबईचा युवा खेळाडू निरव कोळीने पदार्पणातच रौप्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला.
२२ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात भारताच्या आठ खेळाडूंचा सहभाग होता. भारतीय संघात निरव हा एकमेव महाराष्ट्राचा खेळाडू होता. त्यानेच भारताला या स्पर्धेतील एकमेव पदक ७५ ते ८५ या खुल्या वजनी गटात मिळवून दिले. गेम जर्क या प्रकारात उतरलेल्या निरजने १४२ गुणांची कमाई केली.
गेली ५ वर्षे निरव या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. माझगाव, ताडवाडी येथे राहणाऱ्या निरव याचे अर्णव सरकार प्रशिक्षक आहेत. जागतिक स्पर्धेपूर्वी नवी दिल्लीत केटलबेलची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली, त्यामध्ये निरव सीएमएस रॅंक मिळवून आपले विश्व स्पर्धेचे तिकीट पक्के केले. सध्या निरव फिटनेस प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहे.