मुंबई इंडियन्स पराभूत; पंजाब किंग्जची आघाडी 

  • By admin
  • May 26, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love
  • प्रियांश आर्य, जोश इंगलिशची धमाकेदार फलंदाजी 
  • आरसीबी-लखनौ सामन्याचा निकाल ठरवणार नंबर १ टीम 

जयपूर : आयपीएल स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने मुंबई इंडियन्स संघाचा सात विकेट राखून पराभव करत गुणतालिकेत १९ गुणांसह आघाडी घेतली. मात्र, आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्याने कोणता संघ आघाडी घेईल हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा रोमांच अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत कायम राहिला आहे. 

पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान होते. प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीने अपेक्षेप्रमाणे आक्रमक फलंदाजी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. या जोडीने ४.२ षटकात ३४ धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन सिंग १६ चेंडूत १३ धावा काढून बाद झाला. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. बुमराह याने त्याला बाद करुन संघाला पहिले यश पाचव्या षटकात मिळवून दिले. 

प्रियांश आर्य व जोश इंगलिश या जोडीने बहारदार फटकेबाजी करत मुंबई संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि स्फोटक अर्धशतके ठोकली. या जोडीच्या दमदार फलंदाजीमुळे पंजाब संघाचा विजय सुकर बनला. १५व्या षटकात सँटनेर याने प्रियांश आर्य याची वादळी अर्धशतकी खेळी ६२ धावांवर संपुष्टात आणली. त्याने ३५ चेंडूंत ६२ धावा फटकावताना नऊ चौकार व दोन टोलेजंग षटकार मारले. प्रियांश व इंगलिस या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी करत मुंबईचा पराभव निश्चित केला. 

प्रियांश बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात उतरला. जोश इंगलिस व श्रेयस अय्यर या जोडीने आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. १८व्या षटकात सँटनर याने इंगलिस याला ७३ धावांवर पायचीत बाद केले. त्याने नऊ चौकार व तीन षटकार मारले. जोश याने जलद फलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलून टाकले. कर्णधार अय्यर याने उत्तुंग षटकार ठोकत संघाच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. अय्यरने १६ चेंडूत नाबाद २६ धावांचे योगदान दिले. त्याने दोन षटकार व एक चौकार मारला. नेहल वधेरा २ धावांवर नाबाद राहिला. पंजाबने १८.३ षटकात तीन बाद १८७ धावा फटकावत सात विकेट राखून सामना जिंकला. मुंबईकडून सँटनर याने ४१ धावांत दोन विकेट घेतल्या. 

मुंबई इंडियन्सची दमदार फलंदाजी

सूर्यकुमार यादवच्या आक्रमक अर्धशतकामुळे मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मुंबई संघाने २० षटकांत सात गडी गमावून १८४ धावा केल्या. मुंबईकडून स्टार फलंदाज सूर्यकुमार याने सर्वाधिक ५७ धावांची खेळी खेळली. दरम्यान, पंजाबकडून अर्शदीप सिंग, मार्को जानसेन आणि विजय कुमार विशाख यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय हरप्रीत ब्रार यानेही यश मिळवले.

या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ४५ धावांची भागीदारी झाली. मार्को जॅन्सनने रिकेलटन याला श्रेयस अय्यर याच्याकडून झेलबाद केले. रिकेलटन २० चेंडूत २७ धावा काढून बाद झाला तर रोहित शर्मा २१ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह २४ धावा काढून बाद झाला.

त्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली. तो एका टोकाला खंबीरपणे उभा राहिला पण दुसऱ्या टोकाला फलंदाजांकडून त्याला फारशी साथ मिळाली नाही. असे असूनही, उजव्या हाताच्या फलंदाजाने ३४ चेंडूत हंगामातील त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले. तो ३९ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावा काढून परतला. त्याच्याशिवाय मुंबईकडून तिलक वर्मा यांनी एक, विल जॅक्सने २६, हार्दिक पांड्याने २६ आणि नमन धीरने २० धावा केल्या. दरम्यान, मिचेल सँटनर एक धाव काढून नाबाद राहिला.

विल जॅक्स याने ८ चेंडूत १७ धावा फटकावल्या. जॅक्सने दोन चौकार व एक षटकार मारला. हार्दिकने १५ चेंडूत २६ धावा काढल्या. त्याने दोन चौकार व दोन षटकार ठोकले. नमन धीर याने १२ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. त्याने दोन उत्तुंग षटकार मारले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *