
नाशिक ः त्र्यंबकेश्वर येथे राजा शिवछत्रपती व्यायामशाळा येथे वासंतिक मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात झाला.
हे शिबीर डॉ सत्यप्रिय शुक्ल, विष्णुपंत गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या शिबिरामध्ये एकूण ४८ खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंना माजी मल्लखांब खेळाडू आणि प्रशिक्षक अभिषेक कोकणे, राजू गांगुर्डे, मिथिला पैठणकर, तनया गायधनी-दीक्षित या प्रशिक्षकांनी मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले.
नवीन खेळाडूंना प्राथमिक धडे तर इतर खेळाडूंना मल्लखांबमधील विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. खेळाडूंकडून दररोज तीन तास सराव करून घेतला. मल्लखांब प्रशिक्षणासोबत सूर्यनमस्कार, योग, मैदानी खेळ याचा देखिल सराव करून घेण्यात आला. रोज सरावानंतर मुलांना पौष्टिक आहार आणि खाऊ वाटप केला गेला.
मल्लखांब या खेळातून आणि इतर खेळाच्या माध्यमातून करियर, त्याचप्रमाणे अभ्यास आणि खेळ यामध्ये समतोल कसा साधावा या विषयावर माजी मल्लखांब खेळाडू आणि सध्या नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी उत्तरा खानपुरे यांचे खेळाडूंसाठी मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आले होते.
१५ दिवसीय या शिबिराचा समारोप सोहळा सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपक पाटील हे मल्लखांबाचे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू आहेत. तसेच रमेश वझे, दत्तात्रय शिरसाठ, प्रशिक्षक यशवंत जाधव, त्रिवेणी सोनवणे (तुंगार) या मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. या समारोप प्रसंगी खेळाडूंनी अगदी कमी वेळात सराव करून मल्लखांबावर उत्तम असे सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना दीपक पाटील यांनी सांगितले की, मल्लखांब हा सर्व खेळांचा पाया (बेसिक खेळ) आहे. या खेळामुळे खेळाडूंच्या शरीराचा सर्वांगिण व्यायाम होतो. आणि याचा लाभ खेळाडूंना आयुष्यभर टिकतो हे या खेळाचे वैशिट्य आहे असे सांगून खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचे कौतुक केले.