अनुभूती विद्यानिकेतन शाळेतून दिशादर्शक पिढी घडेल – अनिल जैन

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

सीबीएसई पॅटर्नच्या ‘अनुभूती विद्यानिकेतन’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ः ‘मुलांचा स्क्रिन टाईम, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात चांगली पिढी, समाज घडवितांना पाहिजे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती बालनिकेतन आणि आता अनुभूती विद्यानिकेतन जी सीबीएसई पॅटर्नमध्ये सुरू झाली. जी विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता बौद्धिक, सृजनशील, जीवन कौशल्य आणि शारीरिक आरोग्य या सर्व पैलूंचा सर्वांगीण विकास घडविण्यास कटिबद्ध राहील.  यातून भारताची दिशादर्शक पिढी घडेल; असे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले.

‘अनुभूती विद्यानिकेतन’ च्या उद्घाटनाप्रसंगी पालकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालक निशा जैन, मनोज परमार, शोभना जैन, अंबिका जैन, अर्थम जैन व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सुरूवातीला सरस्वती देवीचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

अनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, श्रद्धेय भवरलाल जैन तथा मोठ्या भाऊंनी जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने ‘अनुभूती निवासी स्कूलची’ स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी ‘अनुभूती बालनिकेतन’ ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. ह्यात आता ‘अनुभूती विद्या निकेतन’ जी सीबीएसई पॅटर्नमध्ये सुरू झाली. जे मोठ्या भाऊंचे स्वप्न होते.

 गुरुकूल पद्धतीच्या धर्तीवर असलेल्या या स्कूलमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यासह आर्ट अभ्यासण्यासाठी विशेष क्लास रुमची व्यवस्था याठिकाणी आहे. ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित होण्यास मदत होऊ शकते. शिक्षण तर आहेच त्यासोबत आपण जेथून आलात त्यापेक्षा हे जग सुंदर करण्याचा संस्कार ह्या मुलांमध्ये रूजवला गेला पाहिजे, त्यासाठीच शिक्षकांसह पालकांना लक्ष्य द्यावे लागले; यातून आदर्श समाज घडून जगात भारताची उंची आणखी वाढेल. सीबीएसई पॅटर्नची पहिली बॅच असून मुलं मुलांकडून खूप काही शिकतात त्यामुळे या बॅचला ‘लिडर बॅच’ म्हणून संबोधले जाईल. अनुभूती विद्यानिकेतनची पहिली नंतर पुढे बारवी पर्यंत बॅच सुरू राहिल. मेहरूण परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी भविष्यात पहिली ते बारवी पर्यंत अनुभूती विद्यानिकेतन स्कूल उभारणार असल्याचा मानस अनिल जैन यांनी बोलून दाखविला.

मनोज परमार यांनी प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी स्कूल विषयी जैन परिवाराचे विचार मांडले. भवरलाल जैन यांच्या ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ या पूस्तकातील शिक्षण विषयीचे प्रेरणादायी विचार सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत फक्त शाळेत अॅडमिशन घेण्यापुरते थांबू नये. नवनवीन कल्पनांसह भविष्यातील पिढी घडविण्यासाठी वर्तमान समजून घेणे महत्त्वाचे आहे. व्यापक शिक्षण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण ठरणारे शिक्षण ‘अनुभूती विद्यानिकेतन’ मध्ये दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *