
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयात बारावी कला, वाणिज्य शाखेतील बोर्ड परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या व विज्ञान शाखेतील राष्ट्रीय स्तरावरील नीट,जेईई या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, सातत्य आणि चिकाटी ठेवल्यास जीवनात हमखास यश मिळते. देवगिरी महाविद्यालयांने सातत्याने ग्रामीण विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना सकस आणि पोषक वातावरण निर्माण करून देण्यासाठी अग्रक्रमाने विचार केला असून विद्यार्थी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील हा दृष्टिकोन ठेवूनच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे हर्षे यांनी सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने यांनी महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा सांगून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल महाविद्यालयाच्या यशात भर घालणारा ठरला असून महाविद्यालयाने निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी देवगिरी जेईई, नीटचे संचालक प्रा एन जी गायकवाड यांनी महाविद्यालयातील गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेला जेईई नीट सेल समर्थपणे आम्ही चालवत असून सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सुसज्ज ग्रंथालय व अनुभवी शिक्षकवृंद असून होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शुल्क आकारुन हा जेईई नीट सेल कार्य करत आहे.
उपप्राचार्य प्रा अरुण काटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक करणे त्याचा सन्मान करणे हे सत्कार सोहळ्याची भूमिका असून विद्यार्थ्यांनी आई, वडील, शिक्षक आणि समाजाचा आदर्श पुढे ठेवून सकारात्मकपणे आपल्या पुढील आयुष्याची पावले उचलावी आणि आपल्या जाणीवा सक्षम कराव्या असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नीट, जेईई या आव्हानात्मक परीक्षेत मिळवलेले यश निश्चितच महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेत भर घालणारे ठरले आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची बुद्धी, अचूकता, वेळ आणि निर्णयक्षमतेची कसोटी लागलेली असते या सर्व कसोट्यामध्ये देवगिरीचे विद्यार्थी खरे उतरले असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देवगिरीचे अनेक माजी विद्यार्थी विविध विभागात कार्यरत असून ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी देवगिरी जेईई नीटचे संचालक प्रा एन जी गायकवाड, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे, पर्यवेक्षक डॉ किरण पतंगे, पर्यवेक्षक प्रा रवींद्र पाटील, पर्यवेक्षक प्रा ज्ञानेश्वर हिवरे, पर्यवेक्षिका डॉ सीमा पाटील यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी जेईई परीक्षेत राहुल नितीन पाटील (९९.९ टक्के), तनिषा नितीन ढेरे (९९.८४ टक्के), आदिश देवरे (९९.७७ टक्के), आदित्य चेडे (९८.७८ टक्के), निलेश महानोर (९३.५९ टक्के), आचल डोंगरे (९४ टक्के), सत्यम चप्पलवार, वैष्णवी ठुबे, नीट परीक्षेत तान्या लाड, वरद लाहोटी, संस्कृती बोकन, भावेश मिश्रा, ऊर्वी तांबे तर एमएचटी-सीईटी या परीक्षेत सिद्धी कर्डिले, वैष्णवी ठुबे, वरद लाहोटी, भावेश मिश्रा, ऊर्वी तांबे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
कला शाखेतून बोर्ड परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम जाधव सुदर्शन. द्वितीय वैष्णवी आव्हाळे, तृतीय संध्या पवार तर वाणिज्य शाखेतून बोर्ड परीक्षेत महाविद्यालयातील प्रथम भाले स्वानंदी, द्वितीय पाटील तेजश्री, तृतीय संताशे अनुश्री, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे बोर्ड परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम वल्लभ कवटकर, द्वितीय कुशवंतसिंग रामगादिया, तृतीय सम्यक वाघ या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी यादी वाचन प्रा रवींद्र पाटील, प्रा ज्ञानेश्वर हिवरे, डॉ कल्याण माळी, प्रा अनाया देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिवानंद भानुसे यांनी केले. डॉ किरण पतंगे यांनी आभार मानले.