इंग्लंडच्या फलंदाजांची आता ‘कसोटी’

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

भारताचे ३७१ धावांचे आव्हान; ऋषभ पंतचे ऐतिहासिक शतक, राहुलचे नववे शतक

हेडिंग्ले : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने आधीच झेंडे रोवले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या शानदार शतकांमुळे भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघावर दबाव वाढवला आहे.  एका कसोटी सामन्यात पाच शतके भारताने पहिल्यांदाच ठोकली आहेत हे विशेष. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ६ षटकात बिनबाद २१ धावा काढल्या आहेत. झॅक क्रॉली (१२) व बेन डकेट (९) ही सलामी जोडी खेळत आहे. 

भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एकट्याने इंग्लंड संघाच्या अर्ध्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर, भारताच्या दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी २ आश्चर्यकारक शतके पाहायला मिळाली. केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक ठोकले. राहुलने शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच, ऋषभ पंतनेही शतक ठोकून नवा इतिहास रचला. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा पंत जगातील दुसरा विकेटकीपर-फलंदाज ठरला. भारताने या कसोटीत एकूण ५ शतके ठोकली आहेत. आतापर्यंतच्या कसोटी इतिहासात पाच फलंदाजांनी पहिल्यांदाच शतके ठोकली आहेत. 

ऋषभ पंतने १३० चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ८ वे शतक ठोकले. पंतने शतक झळकावताच, भारतीय कसोटी क्रिकेटच्या ९३ वर्षांच्या इतिहासात एक मोठा चमत्कार घडला. खरंतर, पहिल्यांदाच भारताकडून एका कसोटी सामन्यात ५ शतके झळकावताना दिसली आहेत. लीड्स कसोटीपूर्वी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकाच कसोटी सामन्यात ५ शतके झळकावण्याचा मोठा पराक्रम कधीच केला नव्हता. यापूर्वी, भारताकडून एका कसोटी सामन्यात सर्वाधिक ४ शतके झळकावण्यात आली होती. २००७ मध्ये, भारतीय फलंदाजांनी मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला.

चहापानाच्या ब्रेकपूर्वी भारताने पंतची विकेट गमावली. पंत ११८ धावा करून बाद झाला. त्यानंतर राहुल डाव सांभाळत होता, परंतु तो देखील १३७ धावा करून बाद झाला. राहुल पॅव्हेलियनमध्ये परतताच भारतीय फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. जोश टोंगने त्याच्या एका षटकात भारताला तीन धक्के दिले. भारताने उर्वरित सहा विकेट्स ३१ धावांत गमावल्या. पहिल्या डावातही असेच दिसून आले जेव्हा भारताने शेवटचे सात विकेट्स ४१ धावांत गमावले. पंत आणि राहुल व्यतिरिक्त करुण नायरने २० आणि शार्दुल ठाकूरने ४ धावा केल्या, तर रवींद्र जडेजा २५ धावा काढून नाबाद परतला. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांना खातेही उघडता आले नाही. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स आणि टोंगने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर शोएब बशीरने दोन विकेट्स घेतल्या. त्याच वेळी ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *