
मुंबई ः ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवली-मालवणचे भूतपूर्व आमदार डॉ यशवंतराव बाबाजी दळवी तथा वाय बी यांचे मुंबई मुक्कामी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते.
‘आमचे डॉक्टर’ या नावाने कणकवली तालुक्यामध्ये सुपरीचीत असणारे डॉ वाय बी दळवी १९६२ साली कणकवली व तद्नंतर मालवण (१९७८) या मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर निवडून आले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते.
१९५३ साली वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत न राहता थेट आपले गाव कळसुली गाठले. त्यानंतर कोरोनाच्या साथीमध्ये आजारी पडेपर्यंत अविरत रुग्णसेवा त्यांनी केली. ती तेथील लोकांची गरज आणि परिस्थिती जाणून घेत. अडलेली बाळंतीण आणि सर्पदंशाने बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी रात्री अपरात्री बॅग उचलून ४, ५ मैल ते जात असत. गावासाठी हायस्कूल आणि ओसरगाव- कळसुली तसेच कणकवली- हळवल- शिरवल मार्गे रस्ते श्रमदान आणि भूदान या मार्गाने त्यांनी विकसित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी डॉ श्रीमती साधना, सुपुत्र रणजीत (क्रीडा पत्रकार) तसेच कन्या कल्पना कदम, दीया मोरे, सुप्रिया सुलचंदानी तसेच नातवंडे-पतवंडे आहेत. नातू अनिरुद्ध हा सध्या वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.